| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
यंदा होळी सणाच्या आधीच श्रीवर्धनमध्ये तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते साधारणपणे होळीनंतरच उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागते; मात्र, यंदा चित्र वेगळे असून होळीपूर्वीच उकाड्याने जोर धरला आहे.
गेल्या काही दिवसांत दुपारच्या वेळेत कडक उन्हाचा चटका जाणवत असून बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी वर्दळ कमी झाल्याचे दिसत आहे. समुद्रकिनारी असलेल्या शहरात दमट हवामानामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. नागरिकांमध्ये अंगदुखी, थकवा, डोकेदुखी आणि उष्माघाताच्या सौम्य तक्रारी वाढल्याची माहिती स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांनी दिली.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वातावरणातील बदलत्या हवामान पद्धतींमुळे यंदा तापमानाची वाढ लवकर सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सूती कपडे वापरावेत तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून येणारे दिवस अधिक उष्ण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







