दहावीच्या निकालाचा टक्का वाढला

| पुणे | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.01 टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी 94.73 टक्के लागला.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती. नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. 94.56 टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, 97 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी 93.83 टक्के निकाल लागला होता. गेल्यावर्षी राज्यातील 108 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की यंदा परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यासाठी 271 भरारी पथके, महिलांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. त्याशिवाय जिल्हा स्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. आठ माध्यमांत ही परीक्षा घेण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात आल्याने निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झाली.

Exit mobile version