| कोर्लई | वार्ताहर |
रायगडात सध्या पावसाचं थैमान असल्यामुळे नदी, ओढे, खाडी व धरणाच्या खाली पाणी दुथडी भरून वाहू लागले आहेत, त्याचबरोबर खाडी व समुद्रकिनारी लाटांचा मारा मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्यात बुडण्याची अथवा वाहून जाण्याची आपत्ती आपल्यावर येऊ शकते, यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे मार्गदर्शन मजगाव ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात रायगड भूषण जयपाल पाटील यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच पवित्रा चोगले, उपसरपंच प्रीतम पाटील, ग्रामसेवक सुशांत ठाकूर, सदस्य एनाज अली सुभेदार, माजी सदस्य योगेंद्र गोयजी हे उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत सरपंच पवित्रा चोगले यांनी केले. यावेळी जयपाल पाटील यांनी सांगीतले की, आपले प्रशासन जेव्हा सांगते की कोणीही घराबाहेर पडू नये व खाडी व समुद्रकिनारी जाऊ नये. तरीही अनेकजण कुटुंबासहित या ठिकाणी गुपचुप पोहोचतात, आणि प्रशासनाला त्रास देतात तसेच आपलेही नुकसान करुन घेतात, यासाठी सागर सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांनी आणि समाजसेवकांनी व ग्रामस्थांनीसुद्धा त्यांना विनंती करावी, अन्यथा यांच्यासोबत हुज्जत न घालता नजीकच्या पोलिस ठाण्यांमध्ये संपर्क करावा. यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी 112 क्रमांक महाराष्ट्र पोलिसांचा वापर करताच मुरुड पोलीस ठाणे येथून हवलदार भाग्यश्री म्हात्रे व रसाळ हे 20 मिनिटात येऊन सुरक्षेबाबत माहिती दिली.
मच्छिमार बांधवांनाची सुरक्षा, घरातील विजेची उपकरणे गॅस अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचा वापर, बाळंतपणासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा आणी मोबाइलची सुरक्षा साप, विंचू दंश, लहान मुले, ज्येष्ठांच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. यावेळी 64 ग्रामस्थ, मुले उपस्थित होती. सूत्रसंचालन ग्रामसेवक सुशांत ठाकूर यांनी, तर आभार सदस्य एनाज अली सुभेदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका कांचन ढमाले, अनिता फेगंडू, गीतांजली अमृते, ग्रामपंचायत सदस्य व प्रकाश मुंबईकर,अश्विनी चौरे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.