। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरुन विरोधी पक्षाच्या 12 खासदारांचे संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे पाच, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन खासदारांचा समावेश आहे. सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करुन कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. कारवाईचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. निलंबित खासदारांमध्ये सर्वाधिक म्हणजेच अर्धे खासदार हे काँग्रसचे आहेत. त्याचप्रमाणे सीपीएम, तृणमूल आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे एकूण 12 खासदार निलंबित करण्यात आले आहेत. राज्यसभेच्या 254 व्या अधिवेशनामध्ये म्हणजेच 11 ऑगस्ट 2021 च्या दिवशी झालेल्या मान्सून सत्राच्या वेळेस या सर्व खासदारांनी सभागृहाची प्रतिमा मलिन होईल अशी वर्तवणूक केली. त्यामुळेच राज्यसभेच्या सदस्यांच्या वर्तवणूकीसंदर्भातील नियमांमधील नियम क्रमांक 256 नुसार 12 खासदारांचे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
निलंबित खासदार
एल्लामारम करीम (सीपीएम),फुलो देव निताम (काँग्रेस),छाया वर्मा (काँग्रेस),रिपून बोरा (काँग्रेस)बिनोय विश्मव (सीपीआय),राजमणी पटेल (काँग्रेस),डोला सेन (तृणमूल काँग्रेस),शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस),सय्यद नसीर हुसैन (काँग्रेस),प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना),अनिल देसाई (शिवसेना),अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)
पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना संसदेत शांतपणे प्रश्न विचारण्याचे आवाहन केले आहे. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहे. राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर समजूतदारपणाने आणि ऐक्याने बोलले पाहिजे. योग्य चर्चा करून देशहितासाठी पुढे जाण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे आणि विधायक चर्चा झाली पाहिजे. सरकार आणि त्यांच्या धोरणांविरुद्धचा आवाज संसदेत बुलंद व्हायला हवा, पण संसद आणि अध्यक्षांची प्रतिष्ठाही राखली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.