आठ जणांनी घेतली माघार
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यातून आठ उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. त्यामुळे आता रायगड मतदारसंघात निवडणुकीचा धुरळा उडणार असून, उद्यापासून प्रचाराचं धुमशान रंगणार आहे. 13 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत ही इंडिया आघाडीचे शिवसेनेचे अनंत गीते आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यातच खरी लढत होणार आहे.
उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये सात उमेदवारांचे अर्ज जिल्हाधिकारी जावळे यांनी बाद ठरवले होते. त्यामुळे 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता 13 उमेदवारांमध्येच लढत होणार असली, तरी खरी लढत इंडिया आघाडीचे शिवसेनेचे अनंत गीते आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यामध्येच खरी लढत पहायला मिळणार आहे.
1691 शस्त्रपरवानाधारकांपैकी 1428 जणांनी शस्त्र जमा केली आहेत. 162 जण हे बँक सुरक्षा रक्षक, संस्थांचे सुरक्षा रक्षक यांच्यासह अन्य अशा 162 जणांना वगळ्यात आले आहे. 79 जणांनी शस्त्र बाळगण्याबाबत विनंती केली आहे. त्यावर लवकरच समिती निर्णय घेणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
रायगड पोलिसांनी 16 मार्च ते 22 एप्रिल या कालावधीत सहा लाख 21 हजार 750 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. 22 हजार 57.22 लीटर दारु जप्त केली असून, त्याची किंमत 12 लाख 89 हजार 585 आहे. 51 हजार 412 रुपयांचा पाच किलो 629 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. 19 लाख 80 हजार 310 रुपयांचे मोफत वाटण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तीन कंपनी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यापैकी एक कंपनी अलिबाग येथे दाखल झाली आहे. अन्य कर्जत आणि माणगाव येथे लवकरच रवाना होणार आहेत.
निवडणुका शांतातमय आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असली तरी, 655 आरोपी अद्यापही मोकाट आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांसमोर आव्हान आहे. 270 पैकी 23 जणांना वॉरंट बजावणे बाकी आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही घार्गे यांनी स्पष्ट केले. सीआरपीसी 107 नुसार 2109 जणांकडून बॉण्ड घेतले आहेत. 109 नुसार 65, 110 नुसार 85 जणांनकडून बॉण्ड घेतले आहेत.
जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ होऊन 9 एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील एकूण 23 लाख 66 हजार 58 मतदार नोंदणी झाली आहे. 23 जानेवारीनुसार, जिल्ह्यात 23 लाख 16 हजार 515 मतदार होते. एकूण मतदार संख्येत जिल्ह्यात एकूण 49 हजार 543 इतकी वाढ झाली आहे. यापैकी 32 रायगड लोकसभा मतदारसंघात 9 एप्रिलअखेर एकूण 16 लाख 68 हजार 372 मतदार असून, पुरुष मतदार 8 लाख 20 हजार 605; महिला मतदार 8 लक्ष 47 हजार 763 व तृतीयपंथी चार मतदार आहेत, तर मतदारसंघात 14 हजार 437 वाढ झाली आहे. 23 जानेवारीनुसार मतदारसंघात 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8 लाख 13 हजार 51, तर स्त्री 8 लाख 40 हजार 416 आहेत. मतदारसंघात पुरुष मतदारांमध्ये 7 हजार 90, तर स्त्री मतदारांमध्ये 7 हजार 347 वाढ झाली आहे. वयोवृद्ध 85 वर्षांवरील मतदार व दिव्यांग मतदार धरून मतदान करणार असून, 3 हजार 63 मतदारांनी यासाठी निवडणूक प्रशासनाकडे मागणी नोंदवली आहे.
कोणी घेतली माघार सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सुनील दत्ताराम तटकरी (अपक्ष), आस्वाद जयदास पाटील (शेकाप), अभिजित अजित कडवे (अपक्ष), नंदकुमार गोपाळ रघुवीर (लोकराज्य पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (बहुजन समाज पार्टी आंबेडकर), विजय गोपाळ बना (अपक्ष), गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), अस्मिता एकनाथ उंदिरे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
निवडणुकीच्या आखाड्यात कोण अनंत पद्मा गिते (अपक्ष, निशाणी- गळ्याची टाय), अनंत बाळोजी गिते (अपक्ष, निशाणी- चिमणी), अनंत गंगाराम गिते (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे, निशाणी- मशाल), नतीन जगन्नाथ मयेकर (अपक्ष, निशाणी- पत्रपेटी), मंगेश पद्माकर कोळी (अपक्ष, निशाणी- मनुष्य व शिडी युक्त नाव), प्रकाश बाळकृष्ण चव्हाण (भारतीय जवान किसान पार्टी निशाणी- भेट वस्तू), पांडुरंग दामोदर चौले (अपक्ष, निशाणी- जहाज), सुनिल दत्तात्रेय तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी निशाणी- घड्याळ), श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष, निशाणी-हिरा), अजय यशवंत उपाध्ये (अपक्ष, निशाणी- ऑटो रिक्षा), श्रीमती अंजली अश्विन केळकर (अपक्ष, निशाणी- बेल्ट), अमित श्रीपाल कवाडे (अपक्ष, निशाणी- फुलकोबी), श्रीमती कुमोदिनी रविंद्र चव्हाण (वंचित बहुजन आघाडी निशाणी- प्रेशर कुकर).