। मुंबई । वृत्तसंस्था ।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करत त्यांचा पी ए बोलत असल्याचे सांगून एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी देत 20 लाख रूपयांची खंडणी मागून त्यातील 2 लाख रूपये स्वीकारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने सापळा रचून 6 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल (वय ४७, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण काकडे हा मुख्य सुत्रधार असून त्याने गुगल प्ले स्टोअरमधून फेक कॉल अॅप नावाचे अॅप डाऊनलोड करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला. त्यावरुन त्याने दहा दिवसांपूर्वी अतुल गोयल यांना फोन केला. गोयल यांना तो अजित पवार यांच्याकडून फोन आला, असे वाटले. फोनवरुन त्याने आपण पी ए चौबे बोलतोय असे भासविले. हवेली तालुक्यातील वाढे बोल्हाई येथील शिरसवडी येथील जमिनीसंदर्भातील वाद मिटवून टाका, असे खोटे सांगून वाद मिटविला नाही तर तुम्हाला गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यामुळे गोयल यांना शंका आली. त्यांनी गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार केली.
तर, नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय-28, रा.हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20, रा.हडपसर), सुनिल गौतम वाघमारे (वय 28, रा.हवेली), किरण रामभाऊ काकडे (वय 25), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19, रा.भेकराईनगर, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24, रा.हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.