। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून तपासण्यात आलेल्या 19146 पाणी नमुन्यांपैकी 265 नमुने प्रयोगशाळेत दूषित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास दीड टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले होतेे. त्यामध्ये म्हसळा, मुरुड, श्रीवर्धन, सुधागड आणि तळा या पाच तालुक्यांतील पाण्याचा एकही नमुना दूषित नसल्याचे आढळून आले. दूषित आढळलेले पाणी नमुने प्रशासनाने शुद्ध केले आहेत.
दूषित पाण्यामुळे कावीळ, अतिसार, गॅस्ट्रो आदी साथीचे आजार कुठेही पसरलेले नाही. कारण जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडून टी.सी.एल.पावडर देण्यात येते. प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाणी स्रोतांचे नमुने घेतले जातात. त्या नमुन्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येते. नमुना दूषित आल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करतात.
पाण्याची दोन प्रकारे तपासणी करण्यात येते, त्यामध्ये जैविक, रासायनिक तपासणी केली जाते. पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी प्यावे, पाणी उकळून प्यावे, मेडिक्लोअरचा वापर करावा, पाणी फिल्टर करून पिणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या मदतीने पाणी नमुने तपासण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येते. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या जलदुतांमार्फत दर महिन्याला काही ठराविक भागातील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्यानंतर प्रयोगशाळेत या पाणी नामुन्यांची तपासणी करून हे पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य आहेत की अयोग्य, याबाबतचा अहवाल प्रयोगशाळेमार्फत देण्यात येतो. पाणी नमुने दूषित आढळून आल्यास ते जलस्रोत शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतात. दूषित पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतर पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे बघण्यासाठी पुन्हा नमुने तपासण्यात येतात. त्यानंतरच पिण्यासाठी पाणी वापरले जाते; मात्र जिल्ह्यातील दूषित पाण्याचे संकट कायम आहे. हे प्रमाण पाहता वेळीच खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हे दूषित पाणी जलजन्य आजारांचे कारण ठरू शकते.
शासनाच्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील सर्व 811 ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठा कर्मचार्यांची जलसुरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाणी नमुने घेवून ते प्रयोगशाळेत पाठविणे, चाचणीचे अहवाल आल्यावर पाणी शुद्धीकरण करणे गरजेचे असल्यास त्यासाठीची प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करुन जलस्रोत शुद्ध करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे ही कामे ङ्गजलसुरक्षकफ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.या कामाचा मोबदला म्हणून जलसूरक्षक यांना जैविक पाणी नमुण्यासाठी चाळीस रुपये आणि रासायनिक पाणी नमुन्यासाठी वीस रुपये असा मोबदला दिला जात असून मासिक प्रोत्साहन भत्ता हा शंभर रुपये दिला जातो. तसेच वर्षातून दोन दिवस प्रत्येक पंचायत समिती स्तरावर प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. याचा प्रत्येक दिवशीचा भत्ता हा शंभर रुपये दिला जातो.