चिपळूण | वार्ताहर |
एकाच घरात खासदारकी, आमदारकी, मंत्री अशी तीन पदे आहेत, अशी टीका करीत माजी आमदार संजय कदम यांनी भर बैठकीत तटकरे कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच टीका केल्याने बैठकीचा नूरच पालटला. कदम यांच्या या कृतीमुळे कार्यकर्ते अवाक् झाले. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मुंबईत गुरुवारी बैठक झाली. या वेळी खासदार तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, प्रांतिक सदस्य बाप्पा सावंत, युवती जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर, अजय बिरवटकर, योगेश शिर्के आदी उपस्थित होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक सावर्डे येथे झाली. या बैठकीतही श्री. कदम यांनी परखड भूमिका मांडत खळबळ उडवून दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याबाबत नाराजी व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष सर्वांपर्यंत पोचत नाहीत, असा मुद्दा मांडत तीन जिल्हाध्यक्ष करा, अशी मागणी कदम यांनी केली. यावर खासदार सुनील तटकरे यांनी घटनेत तशी तरतूद नाही, असे सांगून तीन जिल्हाध्यक्ष निवडीचा मुद्दा फेटाळून लावला.