रायगडात जुलैअखेर 63.2 टक्के पाऊस

28 लघु प्रकल्पांपैकी 23 पूर्ण क्षमतेने भरले

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. रायगड जिल्हा नैसर्गिक आपत्तीबाबत दैनंदिन अहवालात मिळालेल्या पावसाच्या अहवालानुसार, सोमवारपर्यंत (दि.29) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 63.2 टक्के पर्जन्य झाले असल्याची नोंद आहे. येथील 28 लघु प्रकल्पांपैकी 23 लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. आत्तापर्यंत 1747 नागरिक स्थलांतरित आहेत.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी 3148.60 मिमी इतका पाऊस पडतो. जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात 1988.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे वार्षिक सरासरीच्या 63.2% पर्जन्य झाले आहे. ही स्थिती दिलासादायक आहे. कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या सर्व नद्या शांत झाल्या असून, इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे.

नद्यांची पातळी (30 जुलै सकाळी 7:30 ची स्थिती)
नदी सद्यःस्थिती धोका पातळी इशारा पातळी
कुंडलिक 22.70 मीटर, 23.95 मीटर, 23.00 मीटर
अंबा 5.40 मीटर, 9.00 मीटर, 8.00 मीटर
सावित्री 3.70 मीटर, 6.50 मीटर, 6.00 मीटर
पातळगंगा 19.65 मीटर, 21.52 मीटर, 20.50 मीटर
उल्हास नदी 44.20 मीटर, 48.77 मीटर, 48.10 मीटर
गाढी नदी 1.85 मीटर, 6.55 मीटर, 6.00 मीटर
जीवितहानी
मिळालेल्या माहितीनुसार, 30 जुलैपर्यंत जिल्ह्यात आपत्तीमुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील पेण तालुक्यातील सापोली आदिवासी येथील यश चंद्रकांत नाईक झाड पडून, महाड दादली येथे नामदेव सीताराम अंबावले नदीमध्ये पडून, वाळण खुर्द येथील बाळाजी नारायण उतेकर ओढ्यात वाहून आणि टेमपाले येथील नसरीन रियाज गोडमे ओढ्यात वाहून मृत झाले आहेत.
पशुधन हानी
जिल्ह्यात मोठी 13 जनावरे मृत झाली. ज्यामध्ये 7 म्हैस, 1 रेडा, 2 गाय व 3 बैल मिळून 13 जनावरे मृत झाली आहेत. तर लहान जनावरांमध्ये 5 शेळ्या मृत झाल्या आहेत तर कोंबड्या व इतर पक्षी 25 मृत झाले आहेत. मोठ्या जनावरांमध्ये 2 गायी आणि लहान जनावरांमध्ये दोन वासरे मिळून 4 जनावरे जखमी आहेत.
तब्बल 1747 नागरिक स्थलांतरित
आत्तापर्यंत तब्बल 565 कुटुंबांचे स्थलांतर झाले असून, यामध्ये 1747 जणांचा समावेश आहे. यामध्ये 91 कुटुंबातील 295 व्यक्ती या नातेवाईकांकडे स्थलांतरित आहेत तर 447 कुटुंबांपैकी 1452 व्यक्ती या कॅम्प मध्ये स्थलांतरित आहेत. एकूण कॅम्प संख्या 29 इतकी आहे. स्थलांतरित नागरिकांमध्ये सर्वाधिक पोलादपूर तालुक्यातील व त्यानंतर महाड, खालापूर आणि माणगाव येथील नागरिकांचा समावेश आहे.
मालत्तेचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार 30 जुलै पर्यंत 11 पूर्णतः पक्के घरे, 19 पूर्णतः कच्ची घरे, 330 अंशतः पक्की घरे व 123 अंशतः कच्ची घरे, 5 झोपड्या, 72 गोठे व 13 दुकानांचे नुकसान झाले आहे. तर 8 सार्वजनिक मालमत्तेचे पूर्णतः व 15 सार्वजनिक मालमत्तेचे अंशतः नुकसान झाले आहे.
एनडीआरएफ व एसडीआरएफ टीम सज्ज
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. रमाई विहार महाड येथे एनडीआरएफ व एसडीआरएफ टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये 2 इन्स्पेक्टर, 3 सब इन्स्पेक्टर, 29 जवान असे मिळून 34 जण तैनात आहेत.
Exit mobile version