न्यूझीलंडला पराभूत करत सलग पाचवा विजय
। धर्मशाळा । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाने गेल्या 20 वर्षांच्या इतिहासात एकदाही आयसीसीच्या स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत केले नव्हते. यापूर्वी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला होता जेव्हा सौरव गांगुली भारताचा कर्णधार होता. त्यामुळे तब्बल 20 वर्षांनी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला आयसीसीच्या स्पर्धेत पराभूत करत इतिहास रचला आहे.
भारताने न्यूझीलंडवर दमदार विजय साकारत हा या वर्ल्ड कपमधील पाचवा विजय ठरला. या पाचव्या विजयासह भारतीय संघाचे गुणतालिकेत आता 10 गुण झाले असून भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. धर्मशाळा येथील सामन्यात न्यूझीलंडने 273 धावा केल्या. भारतासमोर 274 धावांचं आव्हन असताना भारताने दमदार खेळी करत 48 षटकांमध्ये सहज विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने चार चौकार आणि चार षटकार ठोकत 46 धावांची उत्तम खेळी केली. कोहलीने आठ चौकार आणि दोन षटकार ठोकत 95 धावांची दमदार खेळी केली. तर शामीने विकेटचा ‘पंच’ मारत न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने तब्बल 20 वर्षानंतर न्यूझीलंडचा विश्वचषकाच्या सामन्यात पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.