पाणी सोडण्यास विलंब, पिक क्षेत्र घटल्याने शेतकरी चिंतेत
| माणगाव | वार्ताहर |
माणगाव रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र डोळवहाळ बंदाऱ्यातील कालवा ठीकठिकाणी नादुरुस्त झाला आहे. तर शासनाकडून या कालव्याची साफसफाई करण्यासाठी पुरेशी यंत्र सामुग्री मिळत नसल्याने तालुक्यातील शेवटच्या शेतीपर्यत पाणी पोहचत नसल्याने उन्हाळी रब्बी हंगामातील पिकाचे क्षेत्र कमी होवून भात पिक धोक्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील भात पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे.
रब्बी हंगामातील भाताचे पिक हे शाश्वत पिक म्हणून शेतकरी या मुख्य पिकाकडे मोठया प्रमाणात वळतो. मात्र यंदाच्या वर्षी काळ प्रकल्पाच्या कालव्याला मुदतीत पाणी न सोडल्याने तसेच दोन वेळ अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी यंदा कमी प्रमाणात भात पिकाची पेरणी केली. दिवसेंदिवस भाताचे रब्बी हंगामातील भात पिकाचे क्षेत्र घाट आहे. रायगड जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यंदाचे वर्षी 115 हेक्टरवर भात लागवड केली जात आहे. तालुक्यातील उन्हाळी हंगामातील हजारो हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकाचे उत्पादनात कमालीची घट झाली असून यंदा भात पिकाच्या उत्पादनावर चांगलीच संक्रांत कोपणार आहे. तर यंदाचे वर्षी 1350 हेक्टरवर कडधान्ये शेतकऱ्यांनी लावले आहे.
कोकणातील माणसांचे मुख्य अन्न भात हे असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाचे वर्षी 115 हेक्टर म्हणजेच 290 एकरवर भात पिक लावणी होणार आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात भात पिक घेतले जात होते. दिवसेंदिवस या क्षेत्रात घट होत असून सध्या स्थितीत कालवा पाण्यामुळे 1 हजार हेक्टर क्षेत्र पडून आहे. गेल्या वर्षी सन 2020-21 मध्ये हेक्टरी उत्पादन हेक्टरी 40 क्विंटल प्रमाणे 44 हजार 400 क्विंटल सरासरी उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले होते. गेल्यावर्षी सन 2022-23 मध्ये 98 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाच्या उत्पादनात घट होवून 38 क्विंटल उत्पादन मिळू शकले. म्हणजेच 2940 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. पर्यायाने तालुक्याच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत असून याचा फटका जिल्ह्याच्या बाजारपेठेलाही बसणार आहे. भात या मुख्य पिकाबरोबरच शेतकऱ्यांनी कडधान्याचे पिकही मोठ्या प्रमाणात घेतले आहे.
दरवर्षी 15 डिसेंबर रोजी कोकण हंगाम पिकासाठी काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधाऱ्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगावमधील शेतीला सोडण्यात येते. यंदाचे वर्षी हे पाणी 5 जानेवारीला कालव्याला दरवर्षी पेक्षा 20 दिवस उशिरा सोडल्यामुळे शेतकरी नाराज होता. त्यातच दोन वेळ अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतीला फटका बसला आहे. यंदाचे वर्षी माणगाव तालुक्यात भात पिकाची लागवड 115 हेक्टर क्षेत्रावर केली यंदा भाताची क्षेत्र कमी झाले आहे.तरी रब्बी भाताचे क्षेत्र वाढवण्यासाठी शासनांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.