| मुंबई | प्रतिनिधि |
क्रिकेट विश्वाला आजवर मुंबईने अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. या यादीत आता तनुष कोटियनचे आणखी एक नाव जोडले जाऊ शकते. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई चॅम्पियन झाल्यानंतर तनुषला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 500 पेक्षा अधिक धावा केल्या आणि 29 बळीही घेतले आहेत. नुकतेच मुंबईने रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. फायनल सामन्यात मुंबईने विदर्भाचा 169 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. मुंबईला चॅम्पियन बनवण्यात अनेक खेळाडूंचे योगदान आहे. 25 वर्षीय तनुष कोटियनचा परफॉर्मन्स असा होता की त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ऑफस्पिनर तनुषने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही विजयात मोलाचा वाटा उचलला. अंतिम सामन्यातही त्याने 7 फलंदाजांना बाद केले.
5 अर्धशतक आणि एक शतक
या रणजी ट्रॉफी हंगामात तनुष कोटियनने मुंबईसाठी 9 व्या किंवा 10 व्या क्रमांकावर फलंदाजी केली. यानंतरही त्याच्या नावावर 500 हून अधिक धावा आहेत. या मोसमात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणार्या तनुष दुसर्या स्थानावर आहे. 10 सामन्यांच्या 14 डावांमध्ये त्याने 41.83 च्या सरासरीने 502 धावा केल्या आहेत. 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने बडोद्याविरुद्ध 120 धावांची नाबाद खेळी खेळली.
तनुष गोलंदाजीतही अव्वल
तनुष कोटियननेही या 10 सामन्यात 19 बळी घेतले आहेत. गोलंदाजी करताना या ऑफस्पिनरने 2.91 च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या. त्याने रणजी करंडकात एकदा एका सामन्यात 10 बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. अंतिम सामन्याच्या दुसर्या डावात शतक झळकावल्यानंतर विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडेकर खेळत होता. त्याचे खेळणे ही मुंबई संघासाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र तनुषने वाडेकरला बाद करत अंतिम सामन्यात विदर्भाला धूळ चारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली
मुंबई संघाने दिले अनेक दिग्गज खेळाडू
मुंबईच्या रणजी संघाने भारतीय संघाला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. यात अजित वाडेकर ते सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर ते सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा ते अजिंक्य रहाणे या मोठ्या नावांचा समावेश आहे. हे खेळाडू मुंबईतून खेळून टीम इंडियात पोहोचले आहेत. विजय मर्चंट आणि पॉली उमरीगरसारखे दिग्गज खेळाडूही मुंबईतून येतात.