सुरक्षा ठेवीच्या नावावर अतिरिक्त देयक
। पनवेल । प्रतिनिधी ।
वाढत्या उष्णतेमुळे विजेचा वापर वाढला आहे. त्यातच विजेच्या दरातदेखील वाढ करण्याचा निर्णय महावीतरण विभागाकडून घेण्यात आल्याने देयकाच्या रकमेत वाढ झाली आहे. महावितरण विभागाने ग्राहकांना एप्रिल महिन्यात पाठवलेल्या देयकासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीची देयक देखील पाठवत विद्युत ग्राहकांना अजून एक जोरदार धक्का दिला आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वीजग्राहकांना सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्षांतील एका महिन्याच्या सरासरी इतके बिल सुरक्षा ठेव म्हणून ग्राहकाला महावितरणाकडे जमा करावे लागते. वीजग्राहकांनी यापूर्वी मूळ सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वाढलेला वीजदर, वीजवापर लक्षात घेता वीजबिलांमध्ये वाढ झाली आहे. मूळ सुरक्षा ठेव गेल्या आर्थिक वर्षांतील एका महिन्याचे सरासरी वीजबिल, यातील फरकाच्या रकमेचे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल ग्राहकांना देण्यात आले असल्याची माहिती ङ्गमहावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिली.वीजग्राहकांनी दिलेल्या सुरक्षा ठेवीवर कालावधीनुसार 9.5 टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचे राज्य वीज नियामक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार दरवर्षी मार्च महिन्यांच्या वीजबिलांमध्ये ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवरील व्याजाची रक्कम समायोजित केली जाते.
सुरक्षा ठेवीच्या नावावर देयक आताच का? पेट्रोल, डिझेल दर वाढ तसेच घरगुती गॅस दरात झालेल्या भाव वाढीचा फटका सध्या सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यातच असह्य उकाड्याने त्रस्त ग्राहकांकडून विजेचा वापर वाढला आहे. परिणामी महावितरणकडुन ग्राहकांना दर महिन्यापेक्षा जादाची देयक पाठवण्यात आली आहेत. आता त्यात सुरक्षा ठेवीच्या नावावर पाठवण्यात आलेल्या देयकाची भर पडल्याने वीज ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सर्वसामान्य नागरिक सध्या वाढत्या महागाईने त्रस्त आहेत. त्यातच महावितरण विभागाकडून वाढीव देयकासोबत सुरक्षा ठेवीच्या नावावर अव्वाच्या सव्वा रकमेची देयक पाठवण्यात आल्याने, सर्व सामान्य ग्राहकाने कुठे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेमंत जगताप,
वीज ग्राहक