| नाशिक | प्रतिनिधी |
महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवार किंवा जागावाटप पूर्ण झालेले दिसत नाही. नाशिकसह अन्य काही जागांवर महायुतीचे घोडे अडलेले दिसत आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे आग्रही असून, अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. यातच आता छगन भुजबळ यांनी महायुतीला अल्टिमेटम दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी काही ओपिनियन पोलसमोर आले आहेत. याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ही सुरवात आहे, हळूहळू आमच्या जागा वाढतील. आता जरी असे चित्र असले तरी परिस्थिती बदलेल. महाराष्ट्रात व नाशिकमध्ये अजून नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या सभा होणार आहेत, असे छगन भुजबळ सांगितले. नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर भाष्य करताना छगन भुजबळ यांनी थेट महायुतीला अल्टिमेटम दिल्याचे सांगितले जात आहे. नाशिकसाठी ज्यांना उमेदवारी द्यायची असेल त्यांना द्या, पण 20 मे च्या आधी निर्णय घ्या. कारण, 20 मे चा मुहुर्त आहे, त्यामुळे त्या आधी निर्णय झाला तर बरे होईल. तसेच कुठल्याही पक्षाला नाशिकची जागा सोडा, पण 20 मे च्या आधी सोडा, असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, नाशिकच्या काळाराम मंदिरात नाशिकसाठी इच्छुक आणि चर्चेत असलेले हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांची भेट झाली. हेमंत गोडसे माझे मित्र आहेत. अनेकवेळा येथील मंदिरात आलो आहे. रामनवमीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आलो असता, ते पण मंदिरात आले होते. त्यावेळी, त्यांना शुभेच्छा दिल्या, असे भुजबळ यांनी सांगितले.







