| मुंबई | वृत्तसंस्था |
हैदराबादेत जन्मलेल्या आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्यात मूळ धरलेल्या एमआयएम पक्षाची वाढ इतर मुस्लिम पक्षांच्या तुलनेत अल्पकाळात अधिक वेगाने होत आहे. एमआयएम हा पक्ष आता पाय पसरू लागला आहे. मुंबईसह राज्यात मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात पक्षाच्या वतीने चाचपणी सुरू आहे.मुंबईसह राज्यात लोकसभेच्या सहा ते सात जागांवर एमआयएम पक्ष निवडणूक लढणार आणि त्या जागा जिंकणार, असा ठाम विश्वास एमआयएमचे प्रवक्ते अॅड. वारिस पठाण यांनी व्यक्त केला आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही काही पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. तर काही राजकीय पक्षांचे उमेदवार अजून ठरायचे आहेत. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या एमआयएम पक्षानेही लोकसभा निवडणुकीत सहा ते सात उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. निवडून येणार्या जागांवरच उमेदवार उभे करण्याचा एमआयएमचा विचार आहे. त्यादृष्टीने पक्षाने चाचपणी सुरू असून लवकरच एमआयएम उमेदवार जाहीर करणार आहे. ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मुंबईतील दोन मतदारसंघांवर एमआयएमने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याची चाचपणी एमआयएम पक्षाने सुरू केली आहेत. मुंबईतील हे दोन मतदारसंघ पक्षासाठी अनुकूल आहेत की नाही, याबाबतचा पक्षांतर्गत अहवाल आल्यानंतर तेथे उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय होणार आहे.
अकबरुद्दीन ओवेसी यांना गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांत मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील मुस्लिमांचे राजकीय प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून एमआयएमची ओळख आहे. ओवेसी 1984 पासून लोकसभेवर निवडून गेले आहेत. आंध्र आणि महाराष्ट्राशिवाय उत्तर कर्नाटकातही त्यांनी हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 20 जागा लढविणार्या एमआयएमने 11 ठिकाणी दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकाची मते मिळविली होती. आता एमआयएमची ताकद वाढली आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितच्या उमेदवाराला एमआयएमने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, आम्ही दुसर्या कोणत्याही पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून जिंकू, असा विश्वास एमआयएमचे प्रवक्ते अॅड. वारीस पठाण यांनी व्यक्त केला आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीत एमआयएम प्रभावी पक्ष राहील. येत्या काळात मुंबई, मराठवाडा आणि आंध्रात महानगरपालिका आणि पंचायत निवडणुका लढवण्याचे एमआयएमने ठरवले आहे.