। कोर्लई । प्रतिनिधी ।
पावसाळ्यात प्रवासी वर्गाला होणारा त्रास लक्षात घेऊन अलिबाग-मंत्रालय-मुंबई प्रवासी सेवा अटल सेतूमार्गे सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अलिबाग-गेटवे ऑफ इंडिया ही जलवाहतुक प्रवासी सेवा पावसाळ्यात साधारणतः तीन महिन्यासाठी बंद ठेवण्यात येते. अलिबागवरुन मुंबईकडे जाणार्या प्रवाशांसाठी महामंडळाच्या गाड्या असल्या तरीही मुंबईला जाण्यासाठी प्रवासाचा जास्त वेळ लागतो. त्यामुळे अलिबाग आणि परिसरातील नागरिक, व्यापारी, वैद्यकीय उपचारासाठी जाणारे रुग्ण, उच्च शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तसेच पावसाळ्यात अलिबाग आणि परिसरात येणार्या पर्यटकांनाही या अडचणींना सामोरे जावे लागते.
नागरिक व प्रवाशांची समस्या लक्षात घेऊन (दि.25) मे ते (दि.21) सप्टेंबर या कालावधीत सकाळी 6, 7, 8 वाजता व संध्याकाळी मंत्रालय येथून 4, 5 व 6 वाजता परतीच्या प्रवासासाठी अटल सेतू मार्गे शिवशाही आणि साध्या गाड्या सोडण्यात याव्या, अशी मागणी जोग यांनी केली आहे. सोमवारी अलिबाग येथून आणि शुक्रवारी मंत्रालय मुंबई येथून नमूद केलेल्या वेळेव्यतिरिक्त, अतिरिक्त गाड्या सोडल्यास त्यालाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. याबाबत आपल्याकडून संबंधित विभागाला आणि उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांना सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.