| जालना | वृत्तसंस्था |
दंगल घडवण्यासाठी सरकारने ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळावर टीका केली. शिष्टमंडळ दोघांची फजिती करत असून, आम्हाला पाणी पाजून फसवलं असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आंदोलन सुरु केलं असताना मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केला आहे. जातीयवाद मी होऊ देणार नाही. जातीयवाद आणि दंगल घडवण्यासाठीच ही आंदोलनं उभी केली जात आहेत. मी ही लढाई होऊनच देणार नाही. गाव खेड्यातील एकाही ओबीसी, मराठा बांधवावर मी हात पडू देणार नाही. वेळ पडली तर मी एखादं पाऊल मागे घेईन. पण, सरकारचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. सरकारला जिंकू देणार नाही म्हणजे नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.