सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार
। पेझारी । वार्ताहर ।
वडखळ-अलिबाग रस्त्यावर सध्या प्रचंड वाहतूक असते. या वाहतुकीमध्ये मोटरसायकल, सायकल, चारचाकी व अवजड वाहने देखील मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. वडखळ-पोयनाड-पळी-कार्लेखिंड-वाडगाव-सागाव-अलिबाग या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे छोट्या मोठ्या वाहनधारकांचा खड्ड्यात पडून अपघात होत असतात. दिवसेंदिवस हे खड्डे मोठंमोठे होत चालले असून या सर्व खड्ड्यांचा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा समाचार घेताना माजी आमदार पंडीत पाटील यांनी प्रवाशांना खड्ड्यात पाडून त्यांचा जीव सार्वजनिक बांधकाम विभागाला घ्यायचा आहे का, असा संतप्त सवाल केलेला आहे.
काही दिवसांपूर्वी पळी आणि वडखळ या ठिकाणी खड्डे चुकवताना खड्ड्यात पडून काही प्रवासी जबर जखमी झालेले आहेत. या घटनेचा आधार घेऊन माजी आमदार पंडित पाटील यांनी वडखळ-अलिबाग रस्त्याचा आढावा घेतला असता, पळी नाक्याजवळ मोठमोठे खड्डे पडलेले असल्याचे दिसून आले. हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ बुजवावेत व प्रवाशांचा जीव वेठीस धरू नये. कारण या रस्त्यावर मोठ-मोठी वाहने भरधाव वेगाने प्रवास करत असतात.त्यामुळे त्यांना वाट देताना मोटरसायकल व छोटी वाहने खड्ड्यात आपटतात. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यापुढे अशा खड्ड्यांमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास संबंधित अधिकार्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असा प्रश्न करत माजी आमदार पंडीत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे.
अलिबाग तालुक्याच्या विकासामध्ये खराब रस्त्यामुळे अडथळा येतो आहे. त्यामुळे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे. तसेच, सार्वजनिक प्रश्नासंदर्भात नेहमी आवाज उठवला पाहिजे.
माजी आमदार पंडित पाटील