| नेरळ | वार्ताहर |
कर्जत शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हालिवली व किरवली या दोन्ही गावांमधून गेलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे बोगद्याच्या कामामुळे गेली 2 वर्षे येथील ग्रामस्थ यातना भोगत आहेत. बोगदा ब्लास्टिंग कामामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी येथील माजी सरपंच प्रमिला बोराडे या 15 ऑगस्टपासून उपोषणला बसणार आहेत. याबाबतचे निवदेन त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना दिले.
याआधी दोन वेळा त्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला होता. मात्र त्यांना यश आले नाही. पनवेल कर्जत रेल्वे मार्गासाठी बांधण्यात येत असलेल्या बोगद्यासाठी सुरुंग स्फोट केले जात आहेत. मात्र त्यामुळे स्थानिक किरवली आणि हालिवली गावातील दोन्ही गावातील घरांचे नुकसान झाले आहे. तसेच तेथील बोअरवेलचे पाणी गायब झाले आहे. आदिवासी वाडी किरवली, बौद्धवाडी व परिसरातील घरांची झालेली आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येईल, तसेच गावातील अंतर्गत रस्ते तयार करून देण्यात यावे या मागणीसाठी हलवली ग्रामपंचायत माजी सरपंच प्रमिला बोराडे यांनी उपोषण केले होते. त्या दोन्ही उपोषणाच्या वेळी कर्जतचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र ती आश्वासने पूर्ण झाली नाहीत त्याचवेळी प्रशासन त्याबाबत कोणत्याही प्रकारचे सहकार्य स्थानिकांना आणि नुकसान ग्रस्तांना करीत नाही. दरम्यान, बोराडे यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे उपोषणाआधी प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.