। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील 42 गावांमध्ये जलसंजीवनी अभियान राबविणारे युनायटेड वे हि संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून जमिनीतील पाण्याची भूजल क्षमता वाढविण्यासाठी वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी अनेक ग्रामस्थांकडून श्रमदान करण्यात आले.
‘युनायटेड वे मुंबई’ संस्थेचे जल संजीवनी प्रकल्प कर्जत अंतर्गत अंभेरपाडा, पाथरज, खांडस, नांदगाव आणि वारे ग्रामपंचायतमधील 42 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुख्यतः पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी जल आणि मृदा संधारण संबंधित विविध उपक्रमावर प्रकर्षाने भर देण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी (सी.एस.आर.) अंतर्गत युनायटेड वे मुंबई आणि अंभेरपाडा येथील जलसंजीवनी प्रकल्पातील महिला बचतगट तसेच गावातील तरुण यांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. यामागचा हेतू पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हा आहे. याचा उपयोग जमिनीतील पाण्याची भूजल पातळी वाढवून ग्रामस्थांना आणि जनावरांना पिण्यासाठी होईल. यावेळी वनराई बंधारा बांधण्यासाठी 20 महिला बचत गटातील सदस्य आणि 9 तरुण तसेच जलसंजीवनी प्रकल्पातील 4 सदस्य असे एकूण 46 जणांनी एकत्र येऊन श्रमदान केले.