नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सणांचे दिवस सुरू झाल्याने वाढत्या घरगुती किंमती रोखण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने रविवारी खाद्यतेल आणि तेलबियांच्या व्यापार्यांवर 31 मार्चपर्यंत साठा मर्यादा घातली. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. याआधीच एनसीडीईएक्स प्लॅटफॉर्मवर मोहरीच्या तेलाचा व्यापार 8 ऑक्टोबरपासून स्थगित करण्यात आला आहे.
देशांतर्गत किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती गेल्या वर्षभरात 46.15 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. केंद्राच्या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलांच्या किंमती नरम होतील, ज्यामुळे देशभरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असे अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. सर्व राज्यांना जारी केलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश त्या विशिष्ट राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशातील उपलब्ध स्टॉक आणि उपभोग नमुना लक्षात घेऊन खाद्यतेल आणि तेलबियांवर लादलेली स्टॉक मर्यादा ठरवतील. तथापि, काही आयातदार आणि निर्यातदारांना स्टॉक मर्यादेपासून सूट देण्यात आली आहे.