जयंत माईणकर
पु.ल. देशपांडेंवर चित्रपट काढून स्वतःची वेगळी इमेज निर्माण करणार्या महेश मांजरेकरांनी गांधी जयंतीच्या दिवशी नथुराम गोडसे या चित्रपटाची घोषणा केली. केवळ वस्तुस्थितीवर आधारित मनात कुठलाही पूर्वग्रह न बाळगता चित्रपटाची निर्मिती केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
याआधी स्व प्रदीप दळवी लिखित आणि स्व विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक 32 वर्षांपूर्वी प्रथम रंगभूमीवर आलं. महाराष्ट्रात या नाटकाचे चक्क 750 प्रयोग झाले.
महाराष्ट्रीय उच्चवर्णीय प्रेक्षक समोर ठेऊन केलेला हा प्रयोग होता. जो कमालीचा यशस्वी ठरला कारण महाराष्ट्रातील उच्चवर्गात गांधीजीबद्दल तथाकथित तिरस्कार आहे. शरद पोंक्षेनी नथुरामची भूमिका केली होती. नाटकाच्या सुरुवातीच्या स्वगतात गांधीहत्येनंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नथुरामला सावरकर पोलिसांबरोबरच दिसतात. नाटकात लिहिलेल्या प्रवेशानुसार नथुराम स्वगतात सावरकरांच्या पाया पडतो. आणि सावरकर त्याला ‘चिरंजीवी भव’ असा आशीर्वाद देतात. आणि आपल्या आशीर्वादाच्या पुष्टयर्थ सावरकर म्हणतात ‘जेव्हा जेव्हा गांधींचं नाव निघेल तेव्हा तेव्हा नथुराम गोडसे हेही नाव निघेल. आणि चिरंजीवी भव या आशीर्वादाचा अर्थ नामरूपाने नथुराम चिरंजीव राहील असा घेण्यास हरकत नाही. अर्थात असा प्रसंग घडला हे स्वगतरुपी संवादात नाटककारानी दाखवलं आहे. त्यांचं नाटक बर्याच प्रमाणात नथुराम गोडसे याचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे यांच्या ‘गांधीहत्या आणि मी’ या पुस्तकावर आधारित असून स्वतः गोपाळ गोडसेला गांधी हत्या प्रकरणात 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. माहितीनुसार आणि उपलब्ध फोटोनुसार गांधीहत्या खटल्यात आरोपी असलेले सावरकर खटल्यातील इतर कोणाही आरोपींशी बोलत नसत. आणि कोर्टात सर्वात शेवटच्या रांगेत बसत. मात्र इतर आरोपी आपसात बोलत असत. जर नाटकात लिहिलेल्यानुसार सावरकरांनी नथुरामला चिरंजीवी भव असा आशीर्वाद दिल्याचं खरं मानलं तर ते वाक्य म्हणजे एक प्रकारे नथुरामच्या कृत्याला पोलिसांसमोर सावरकरांनी आशीर्वाद आणि पाठिंबाही दिला असं म्हटलं पाहिजे. पण सर्वोच्च न्यायालयाने तर सावरकरांची गांधीहत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. आणि सावरकारांचा सर्व कृत्ये आपल्या सहकार्याकडून करवून घेऊन स्वतः नामानिराळे राहण्याचा एकूण स्वभाव पाहता त्यांनी पोलिसांच्या समोर असा आशीर्वाद दिला असण्याची शक्यता नगण्य आहे. मग लेखकाने विचारस्वातंत्र्याचा फायदा घेत सावरकरांनी नथुरामला दिलेल्या आशीर्वादाची कपोलकल्पित कहाणी रचली की ती घटना म्हणजे दोन ओळींच्या मधील बाहेर न आलेल्या वस्तुस्थितीचं दर्शन आहे. माझ्या दृष्टीने चिरंजीवी भव हा पूर्ण घटनेचा टर्निंग पॉईंट आहे.
महाराष्ट्रात ‘गांधी विरूद्ध गांधी’ हे नाटकही यापुर्वी येऊन गेले आहे. हिंदीत ‘मैने गांधी को नही मारा’ हा अनुपम खेर अभिनित तसेच ‘हमने गांधीजीको मार दिया’ हे चित्रपटही येऊन गेले आहेत. गांधीजींचा मुलगा हिरालाल गांधी यांच्या चरित्रावर आधारीत अक्षय खन्नाचा ‘गांधी माय फादर’ हा गांधीजी कसे अयशस्वी पिता होते सांगणारा अनिल कपुर निर्मित सिनेमाही येऊन गेला आहे. त्यमुळे चित्रपटातून गांधीजींवर टिका नवीन नाही. रिचर्ड एँटिनबरो या जागतिक फिल्म निर्मात्याने गांधीजीवर 1982 साली गांधी ही अप्रतिम कलाकृती जगभरातील सिनेरसिकांसमोर मांडली.
गांधीजींची हत्या भारतीय स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच महिन्यात झाली. भारतीय स्वातंत्र्य, फाळणी, पाकिस्तानची निर्मिती, धार्मिक दंगे याना डोळ्यासमोर ठेवून गांधीजीच्या विरोधाचीही एक बाजू उभी केली जाते.गांधीजींच्या च्या मारेकर्यांंचीही एक बाजू आहे, असा एक मतप्रवाह आहे. गेल्या 73 वर्षांपासून हिंदुत्ववादी ती ‘हत्या’ नसून ‘वध’ होता आणि तो वध काळाची आणि देशाची गरज होती हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे. हिंदू संस्कृतीत वध या शब्दाचा वापर राक्षसाला मारल्यानंतर केला जातो.जाणीवपूर्वक तो शब्द वापरून हिंदुत्ववादी गांधींची तुलना राक्षसाशी करतात. गांधीहत्येवरील गोपाळ गोडसेंचे पुस्तक याच प्रयत्नाचा भाग आहे. हा प्रयत्न अनेक कथा, कादंबर्या, नाटके आणि चित्रपटातून केलेला आहे.
स्टँनली वॉलपर्ट यांनी नथुरामची बाजू मांडण्याचा एक तटस्थ प्रयत्न 1962 साली ‘नाईन अवर्स टू रामा’ या कादंबरीच्या माध्यमातून केला होता. त्यावर अमेरिकेत याच नावाचा चित्रपटही येऊन गेला. भारतात या दोन्हींवरही बंदी घालावी अशी मागणी कॉग्रेसनेही केली आणि हिंदुत्ववाद्यांनीही केली होती. त्याचे एक कारण म्हणजे त्यात नथुरामचे अनैतिक सबंधही मांडले होते. ‘गोकुळ शंकर’ नावाचा एक भारतीय चित्रपटही या कादंबरीवर आला पण त्यावरही बंदी घातली गेली कारण तो स्टँनली वॉलपर्ट यांच्याच कादंबरीवर आधारीत होता.
कमल हसनने याच स्टँनली वॉलपर्टच्या कादंबरीवर आधारीत ‘हे राम’ हा चित्रपट काढला पण त्याने गांधीजींचीच बाजू मांडली आणि हत्येचे समर्थन केले नव्हते. ‘नाईन अवर्स टू रामा’ या कादंबरीत किंवा त्यावरील चित्रपटात गांधीजींचा तिरस्कार करणारे लोकही भारतात होते आणि त्यांनी गांधीजींची हत्या करताना त्यांची नेमकी काय भुमिका होती हे मांडले होते. एखाद्या गुन्हेगारांवर चित्रपट निघणे नवीन नाही.
भारतीय चित्रपट सृष्टीत अशा चित्रपटांची तर मांदियाळी आहे. अमिताभ बच्चनचा ’दिवार’ असो शहारूख खानचा ’डर’ किंवा नानावटी खून खटल्यावर आधारित अक्षयकुमारचा ’रूस्तुम’ हे सर्व चित्रपट तर गुन्हेगारालाच नायक बनविणारे आहेत. आणि त्यामुळे दुर्दैवाने विकृतीलाच प्रतिष्ठा मिळते. आपल्याला दिवारच्या अमिताभपासून रुस्तुम च्या अक्षय कुमारपर्यंत सर्वांच्याबद्दल आपलेपणा वाटू लागतो ते गुन्हेगार असले तरीही. आणि इथेच आपण फार मोठी चूक करतो.
महत्वाची बाब अशी की, गोडसेच्या कृत्याच उदात्तीकरण करणारे असे कितीही चित्रपट, नाटके, कथा, कादंबरी आले तरीही हिंदुत्ववाद्यांना सुद्धा गांधींच नाव घ्यावं लागतच. मोदींना नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीत गांधींजींचाच दाखला द्यावासा वाटला . तिथे त्यांना हेडगेवार, गोळवलकर किंवा सावरकर आठवले नाहीत. नथुरामचा तर प्रश्नच नाही. 1934 पासून गांधीहत्येचे 30 जानेवारी 1948 पर्यंत गांधीहत्येचा पाच वेळा प्रयत्न केला गेला. भारत-पाक फाळणी, 55 कोटी, मुस्लीम अनुनय अशी काही कारणं सांगून त्यांच्याबद्दल द्वेषाची बिजे पेरण्याचे प्रयत्न केले गेले. या कारणांनाच पुढे करून आजही गांधीहत्येचं समर्थन आणि उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे.
79 वर्षाच्या वृद्धाला तीन गोळ्या मारून ठार करणे हा केवळ गुन्हा नव्हे तर अक्षम्य अपराध आहे.आणि गुन्हा हा कोणत्याही कारणामुळे घडलेला असला तरीही गुन्हा हा गुन्हाच राहतो. आणि कुठल्याही गुन्ह्याच पद्धतशीरपणे उदात्तीकरण करण हेही तितकंच अक्षम्य आहे. मांजरेकरांना चित्रपट काढण्याचा अधिकार निश्चित आहे. कारण भारत हा लोकशाहीवादी आणि व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवणारा देश आहे. मात्र अशाच प्रकारचे चित्रपट इंदिरा, राजीवच्या मारेकर्यांवर निघाले तर त्यांनाही स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. इतकच नव्हे देवाच्या अस्तित्वावर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करणारे किंवा त्याची दुसरी बाजू सांगणारे चित्रपट आले तर हिंदुत्ववादी स्वीकारतील?
तूर्तास इतकेच!







