कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदेश लागू
| अलिबाग | प्रतिनिधी |
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 24 जून ते 8 जूलै रात्री बारावाजेपर्यंत हा आदेश काढण्यात आला आहे. आंदोलन, मोर्चे काढण्याबरोबरच पाचपेक्षा अधिक मंडळी जमण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या औद्योगिक भागांमध्ये कामगार संघटनांकडून आंदोलन व संप पुकारले जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक व जातीय तणावाचे प्रसंग, तसेच दि.27 जून ते दि.6 जुलैपर्यंत मुस्लिम बांधवांचा मोहरम हा सण साजरा करण्यात येणार आहे. सदरवेळी मोहरम निमित्त पाच ठिकाणी नमाज पठण होणार असून, 72 ठिकाणी मिरवणूका काढण्यात येणार आहेत. 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी हा सण साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या कालावधीत शस्त्र, लाठ्या, सुरे, तलवारी आदी वस्तू बाळगणे, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन फिरणे, दगडफेक किंवा क्षेपणास्त्रे बाळगणे व तयार करणे, प्रतिमा किंवा आकृत्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, आक्षेपार्ह घोषणा, गाणी किंवा वाद्य वाजविणे, धोकादायक भाषण, हावभाव, चित्रप्रदर्शन पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव परवानगी शिवाय करण्यास बंदी आहे. शासकीय अधिकारी, शासकीय कर्तव्यावरील कर्मचारी, शवयात्रा व अंत्यविधीसाठी जमणारा जमाव, आणि तहसीलदारांच्या परवानगीने आयोजित कार्यक्रम वगळण्यात आले आहेत. तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यावर कोणताही उत्सव, सभा, मिरवणूक आयोजित करता येणार आहे, त्याची जबाबदारी आयोजकांची राहणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी सांगितले आहे.







