| नागोठणे | महेश पवार |
मुंबई- गोवा महामार्गावरून नागोठणे पासून मुंबईकडे जाण्यासाठी असलेल्या मिरानगर येथील बंदिस्त उड्डाण पुलाचा कठडा धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. या पुलाचे काम सुरू असतांनाच पुलाच्या एका ठिकाणी काही भागातील सिमेंटचे पॅनेल पडले आहेत. तसेच या उड्डाण पुलाचा काही भाग कलंडल्या सारखा दिसत असल्याने जर हा पूल कोसळून अपघात घडल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने महामार्गाच्या ठेकेदार कल्याण टोल प्लाझा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.
नागोठण्यातील मिरानगर येथील या बंदिस्त उड्डाण पुलाचे काम प्रगती पथावर असून, ते लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नागोठण्याहून मुंबईकडे जाताना याच पुलाच्या कठड्याच्या वरील बाजूचे 3 ते 4 सिमेंटचे पॅनेल काही दिवसांपूर्वी कोसळले आहेत. उंचीने व लांबीने खूप जास्त असलेल्या या पुलाचा कठडा हा कलांडल्यासारखा दिसून येत आहे. पुलाच्या बाजूनेच असलेल्या सर्व्हिस रोड वरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. तसेच नागोठण्याच्या आजुबाजूला असलेल्या आमटेम, कोलेटी, शेतपळस, निडी, पळस, बाहेरशिव, वाघळी, कोंडगाव गावांतील नागरिक याच सर्व्हिस रोड वरून ये जा करीत असतात. मात्र, चुकून या पुलाचा कठडा कोसळला तर मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याने महामार्ग प्राधिकरणाचे व कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांनी पुलावर तातडीची उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालक व स्थानिक नागरिकांतून होत आहे. दरम्यान यासंदर्भात कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जरी पूल कलांडल्यासारखा दिसत असला तरी आतून पुलाला भक्कम आधार असल्याने पूल सुरक्षित असून, पुलाला कोणताही धोका नाही असेही संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.







