उत्तरप्रदेश, नेपाळची आंतराष्ट्रीय टोळी गजाआड
| अलिबाग | प्रतिनिधी |
टेलिकॉम ॲथोरेटी ऑफ इंडियाच्या नावाने संपर्क साधून अलिबागमधील एका वयोवृध्दाला 66 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. रायगड पोलिसांनी या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला. नेपाळसह उत्तरप्रदेशमधील आंतरराष्ट्रीय टोळीला गजाआड करण्यात आले असून, बीएसएनएल, जिओ( रिलायन्स), टाटा टोकोमो अशा विविध कंपन्यांचे सहा हजार 175 सीमकार्ड जप्त केले आहेत. अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, याती दोघेजण जिओ सेल एक्झिक्युटिव्ह असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.
आंचल दलाल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 5 मे 2025 रोजी अलिबागमधील एका वयोवृध्द व्यक्तीशी अज्ञात व्यक्तीने लँड लाईनवरून संपर्क साधला. टेलिकॉम ॲथोरेटी ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. मोबाईल नंबर बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. ही सेवा सुरु करण्यासाठी नऊ नंबर डायल करण्यास सांगितले. त्या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वयोवृध्द व्यक्तीने नऊ नंबर डायल केला. त्यानंतर थोड्यावेळाने एका मोबाईलवरून त्यांना पुन्हा व्हीडोओ कॉल करण्यात आला. मनी लाँड्रीगचा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची भिती त्यांना दाखविली. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरु होता. यातून सुटका हवी असल्यास वेळोवेळी वेगवेगळ्या बँकातील खात्यामध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. टेलिकॉमचा वापर करूनएकूण 66 लाख रुपयांचा गंडा वयोवृध्दाला घातला होता. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा तपास करण्यात आला. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने शोध मोहिम सुरू करण्यात आली. ऑनलाईन पध्दतीने लंपास करण्यात आलेली रक्कम ए. एच. अगोर वुड ऑईल इंडस्ट्रीचे संचालक अब्दूस सलाम बारभुयान यांच्या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तपासाला अधिक गती देण्यात आली. अखेर अब्दूसला आसाममधून अटक करण्यात आली.त्यानंतर नदीम अहमद, लैराव खान, शादान खान, मोहम्मद खान यांना ताब्यात घेण्यात आले. हे चौघेजण जिओ सेल एक्झिक्युटिव्ह विनयकुमार राव, गंगाधर मुत्तान यांच्याशी संगमनत करून बनावट केवायसी कागदपत्रे बनवित होते.
86 हजार जणांना फसवणुकीसाठी कॉल
आरोपी आदित्य उर्फ अभय मिश्रा हा एसआयपी लाईन कनेक्शनसाठी एग्रीगेटर म्हणून काम करीत होता. हा पाच सर्व्हर चालवित होता. 28 दिवसांमध्ये एसएमएसद्वारे एका सर्व्हरमधून 62 लाख 92 हजार कॉल करण्यात आले. त्यापैकी 23 लाख 33 हजार नागरिकांना प्रत्यक्षात कॉल केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 86 हजार 910 जणांना फसवणूकीसाठी कॉल केले आहेत. त्याला उत्तरप्रदेशमधून अटक केली.







