| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडूनही चिडीपाडा येथील गाव टंचाईच्या विळख्यात सापडला आहे. एका राजकीय व्यक्तीने जेसीबीने खड्डा खोदल्याने पाईपलाईन फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली.
अलिबाग-रेवस मार्गावरील चिडीपाडा येथे एका स्थानिक राजकीय व्यक्तीने स्वार्थासाठी किंवा स्टंटबाजीसाठी जेसीबी लावून चिडीपाडा येथील खड्डा मुद्दाम मोठा केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी दिली. खड्डा खोदताना पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने ऐन मुसळधार पावसात स्थानिक नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. समोर आलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होते की, डांबरी रस्त्याच्या कडेला मोठमोठे डांबराचे खडक व मातीचे ढिगारे साचले होते. अपघाताची तीव्रता लक्षात घेता, तेथे सुरक्षेसाठी लाकडी काठ्या आणि कपडे बांधून तात्पुरता धोक्याचा इशारा उभारण्यात आला होता. या खड्ड्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून रस्ता खराब करणाऱ्या आणि पाणीपुरवठा खंडित करणाऱ्या संबंधित राजकीय व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला, तरी पाईपलाईन फुटल्याने चिडीपाडा येथील नागरिकांचे पाण्याविना हाल झाले आहेत. ही पाईप लाईन दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.







