25 दिवसानंतरही ताम्हिणी मार्ग ठप्पच; नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त
| माणगाव | सलीम शेख |
पुणे, माणगाव आणि दिघी आंतरराष्ट्रीय बंदराला जोडणारा महत्त्वाचा ताम्हिणी घाट मार्ग गेल्या 25 दिवसांपासून बंद आहे. दि.5 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्याचा काही भाग खचला, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक व पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील या मार्गाची दुरुस्ती अद्याप पूर्ण झालेली नसल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सन 2001 मध्ये वाहतुकीसाठी खुला झालेला ताम्हिणी घाट मार्ग हा पुणे आणि कोकणला सर्वात कमी अंतरात जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हजारो पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा रस्ता कोकणच्या पर्यटन उद्योगाचा कणा म्हणून ओळखला जातो. दिघी आंतरराष्ट्रीय बंदराशी हा मार्ग जोडला गेल्यानंतर त्याचे आर्थिक महत्त्व आणखी वाढले. व्यापारी वाहतूक, औद्योगिक मालाची ने-आण, तसेच शिक्षणासाठी पुण्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरला आहे. पुणे हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र असल्याने रायगडसह कोकणातील हजारो विद्यार्थी दररोज या मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्ता बंद असल्यामुळे त्यांना खोपोली-लोणावळा मार्गे मोठा वळसा घालावा लागत असून, वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. त्यामुळे ताम्हिणी घाट बंद झाल्याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला बसला आहे.
येथील हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप, लघुउद्योजक, स्थानिक दुकानदार आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. पर्यटन हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यवसायिकांचे व्यवहार ठप्प झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, खासदार सुनिल तटकरे यांनी नुकतीच पुणे जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, दि.31 जुलैपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे खासदारांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दोन दिवसांत हा रस्ता पुर्ववत सुरू होतो का, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, ताम्हिणी घाट 25 दिवसांपासून बंद आहे आणि प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. त्यामुळे रायगडच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. येथील हॉटेल, होमस्टे, दुकानदार आणि विद्यार्थी सगळेच वेठीस धरले गेले आहेत. त्यामुळे रायगडच्या पर्यटन व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान कोण भरून देणार? एमएसआरडीसीच्या निष्क्रियतेला आता जनता माफ करणार नाही. खचलेला रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे देण्यात आला आहे.
ताम्हिणी घाट मार्ग हा रायगडच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेचा जीवनदायी दुवा आहे. हा मार्ग बंद असल्याने हजारो व्यावसायिक, हॉटेल चालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. एमएसआरडीसीने पुणे हद्दीतील खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून मार्ग सुरू करावा. अन्यथा जनतेच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
संताजी पवार,
श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष,
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)







