। मुंबई । वृत्तसंस्था ।
गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडले आहे. अनुदान रखडल्याने केंद्रचालक अडचणीमध्ये सापडले आहेत. अनुदानच मिळत नसल्याने शिवभोज केंद्र यापुढे सुरू ठेवणे शक्य नसल्याचे चालकांनी म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपले रोजगार गमावेले होते. या काळात जनतेला दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून शिवभोजन थाळी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गंत अगदी माफक दरात सर्व सामान्यांना जेवण उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून निधी रखडल्याने यातील अनेक केंद्रे आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
दरम्यान, अनुदानाच्या मुद्द्यावरून माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आधीच कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता त्यात राज्य सरकारने शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे पैसे थकवल्याने ते अडचणीमध्ये आले आहेत. मात्र शिवसेना आणि राज्य सरकारला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसल्याची टीका त्यांनी केली आहे.