आता संपूर्ण राज्य तिसर्या टप्प्यात
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र, निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोकादेखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसर्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.
आता सर्व जिल्हे तिसर्या टप्प्याच्या वरच असणार आहेत. महाराष्ट्र सरकारने पाच टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसर्या टप्प्यांच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारनं हे पाऊल उचललं आहे. टप्पा कमी करायचा असेल तर दोन आठवड्याचा ट्रेंड चेक करावा लागणार असल्याची माहिती आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
काय आहेत नवे निर्बंध?
अत्यावश्यक दुकाने दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. तसेच इतर दुकाने दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. पण, शनिवार-रविवारी पूर्णपण बंद असतील.
मॉल, चित्रपटगृह बंद.
हॉटेल्सना दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी; परंतु शनिवार-रविवार बंद.
उद्याने, मैदाने, जॉगिंग पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरू राहतील.
सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी.
खासगी कार्यालये (परवानगी मिळाल्यास) 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
चित्रीकरणाला बायो बबल वातावरणात परवानगी. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर बाहेर जाण्यास परवानगी नाही.
सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील. उभ्याने प्रवास करता येणार नाही.
जीम, सलून, स्पा 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
लग्नाच्या हॉलला 50 टक्के क्षमतेने खुले राहण्यास परवानगी देण्यात येईल. कमाल 100 लोकांची उपस्थितीत राहण्यास परवानगी असेल.
अंत्यसंस्कार विधीला 20 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
डेल्टा प्लस या व्हेरियंटमुळे कुठलेही निर्बंध लावले जाणार नाहीत. दरम्यान, तिसर्या लाटेसंदर्भात शासन स्तरावर सर्व तयारी झाली असून, राज्याचा आरोग्य विभाग यासाठी सज्ज आहे.
राजेश टोपे, आरोग्यमंत्री