। मुंबई । वृत्तसंस्था ।
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 18 वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने मुंबई इंडियन्सवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या 151 धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने आठ गडी राखून गाठले. मुंबईला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्यासाठी सूर्यकुमार यादवने मोठी मेहनत घेतली. मात्र, बंगळुरुने मुंबईला नमवत विजय संपादन केला. या सामन्यातील पराभवानंतर मुंबईने हा सलग चौथा सामना गमावला आहे.
मुंबईने दिलेले 152 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरुच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून मोठे फटके मारायला सुरुवात केली होती. सलामीला आलेले फाफ डू प्लेलीस आणि अनुज रावत या जोडीने 50 धावांची भागिदारी केली. त्यानंतर नवव्या षटकामध्ये फाफ डू प्लेलिस उनाडकटने टाकलेल्या चेंडूचा सामना करताना झेलबाद झाला. फाफ डू प्लेलिसने 24 चेंडूंमध्ये 16 धावा केल्या. त्यानंतर दुसर्या विकेटसाठी आलेल्या विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली. अनुज रावत सुरुवातीपासून मोठे फटके मारत होता. त्याने 47 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 2 चौकार लगावत 66 धावा केल्या. तर विराट कोहलीनेही 36 चेंडूंमध्ये 5 चौकारच्या जोरावर 48 धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीमुळे बंगळुरुचा विजय आणखी सोपा झाला.







