नि. दत्तात्रय शेकटकर
गेल्या काही वर्षांपासून शत्रूचं नुकसान करण्यासाठी किंवा शत्रूपक्षाच्या सैनिकांना मारण्यासाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ‘इसिस’ या दशहतवादी संघटनेने इराक आणि सीरियामध्ये ड्रोनचा वापर करून हल्ले केले. पण या ड्रोन हल्ले फारसे गांभीर्याने घेतले गेले नाहीत. त्यानंतर हळूहळू इस्रायलने ड्रोन हल्ल्यांचा वापर करायला सुरूवात केली. इराकच्या सहसेनाध्यक्षांनाही ड्रोन हल्ला करून संपवण्यात आलं. बगदादच्या विमानतळानजीक त्यांना मारण्यात आलं. इराणच्या प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञांनाही ड्रोन हल्ला करून मारण्यात आलं. सौदी अरेबियातल्या तेलनिर्मिती करणार्या कारखान्यावर ड्रोन हल्ला करण्यात आला. या सगळ्या भारताच्या अवतीभवती असणार्या राष्ट्रांमध्ये घडलेल्या घटना आहेत. मात्र दुर्दैवाने आपण या नव्या तंत्राकडे म्हणावं तितकं लक्ष दिलेलं नाही. आजच्या घडीला युद्धतंत्रात बदल होत असताना, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होत असताना आपल्या आसपास काय घडतंय, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हे नवं तंत्रज्ञान चीन, पाकिस्तानसारख्या शत्रुंसोबतच देशांतर्गत राष्ट्रद्रोहीदेखील वापरू शकतात, ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी.
आज ड्रोनचा वापर व्यावसायिक कामासाठी केला जातो. ड्रोनच्या माध्यमातून एखादी वस्तू किंवा खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न होताना दिसतात. आज अशा पद्धतीने दोन किलो वजनाचं सामान ड्रोनच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचवलं जात असेल तर याद्वारे तेवढ्याच वजनाचं आरडीएक्सही पोहोचवलं जाऊ शकतं. स्फोटक सामग्री पोहोचवली जाऊ शकते. जम्मूमध्येही असाच प्रकार घडल्याचं आपल्याला पहायला मिळतं. पाकिस्तान तसंच पाकिस्तानचं सैन्य 2019 पासून भारताविरोधात ड्रोनचा वापर करत असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानने भारतीय सीमाभागात ड्रोनचा वापर करून एके 47, अमली पदार्थ पाठवले आहेत. मात्र आपण ही बाब फार गांभीर्याने घेतली नाही. पाकिस्तानने एके 47, स्फोटकं तसंच अमली पदार्थ पाठवण्यासाठी ड्रोनचा जसा वापर केला तसाच वापर जम्मूच्या विमानतळावरील हवाई दलाचं काम सुरू असणार्या तांत्रिक विभागावर हल्ला करण्यासाठीही केला. शत्रू काय करतो तर एक, एक पाऊल पुढे टाकतो. सुरूवातीला तो तुम्हाला चिमटा काढतो. त्यावर तुमची प्रतिक्रिया बघतो. मग थप्पड मारतो. मग दगड फेकतो. एवढं करूनही तुम्ही काहीच करणार नाही, फक्त आरडाओरडा करणार हे लक्षात आल्यावर तो मोठा हल्ला करण्यासाठी सज्ज होतो. पाकिस्ताननेही तसंच केलं.
पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला ते ठिकाण जम्मूमधल्या भारत-पाकिस्तान सीमेपासून फार लांब नाही. हे अंतर साधारण 14 ते 15 किलोमीटरचं असावं. आजच्या काळातले ड्रोन 60 ते 70 किलोमीटरचं अंतर अगदी सहज कापू शकतात. छोट्या आकाराच्या ड्रोनला रडार यंत्रणा टिपू शकत नाही आणि आपल्या याच कमतरतेचा फायदा पाकिस्तानने उठवला. ड्रोनला टिपणारं तंत्रज्ञान तुमच्याकडे नाही हे माहीत असल्यामुळेच पाकिस्तानने हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर केला. या हल्ल्यामुळे भिंत तुटली तसंच थोडंफार नुकसान झालं. मात्र या ठिकाणापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर आपली हेलीकॉप्टर्स होती. ही स्फोटकं तिथे पडली असती तर आपलं किती मोठं नुकसान झालं असतं याचा विचार करायला हवा. या घटनेच्या दुसर्याच दिवशी देशाचे संरक्षणमंत्री जम्मू विमानळावर येणार होते. दिल्ली ते जम्मू आणि जम्मू ते लडाख असा प्रवास ते करणार होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौर्यादरम्यान अशी काही घटना घडली असती तर आपलं चांगलंच हसं झालं असतं. ज्या राष्ट्राचे संरक्षणमंत्रीच सुरक्षित नाहीत त्या राष्ट्राचं संरक्षण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला गेला असता. जम्मूमध्ये झालेला ड्रोन हल्ला लक्षात घेता येत्या काळात पाकिस्तान भारतातल्या संवेदनशील भागांमध्ये हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतो, असं म्हणायला वाव आहे. दहशतवादीही ड्रोनचा वापर करून दहशत पसरवू शकतात. म्हणूनच ड्रोनच्या वापराकडे केलेलं दुर्लक्ष आपल्याला चांगलंच महागात पडू शकतं.
जम्मूतल्या वायूदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न उपस्थित होतो. भारत-पाकिस्तान सीमेनजीक असे ड्रोनहल्ले होऊ शकतात. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ड्रोनचा वापर होऊ शकतो. मात्र भारतातल्या एखाद्या महत्त्वाच्या धरणावर असा ड्रोन हल्ला झाला तर आपलं केवढं मोठं नुकसान होईल? भारत-पाकिस्तान सीमेनजीक अनेक धरणं आहेत. पंजाबमध्ये, जम्मूमध्ये धरणं बांधण्यात आली आहेत. धरण फुटल्यावर किती प्रचंड नुकसान होऊ शकतं हे आपण अनुभवलं आहे. येत्या काळात ड्रोनच्या माध्यमातून असे हल्ले केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताच्या किनारपट्टी भागात अत्यंत महत्त्वाचे असे कारखाने आहेत. नैसर्गिक वायू आणि खनिज तेलावर प्रक्रिया करणारे कारखाने किनार्यांलगत आहेत, आपले रिअॅक्टर्स आहेत. भविष्यात अशा पद्धतीने ड्रोनचा वापर करून समुद्री मार्गाने हल्ला झाला तर आपली अर्थव्यवस्था डळमळीत होऊ शकते, खनिज तेलावर प्रक्रिया करणार्या कारखान्यांचं मोठं नुकसान होईल. आपल्या व्यापाराचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आपल्याला या ड्रोन हल्ल्यांविरोधात सुसज्ज होण्याची आवश्यकता आहे.
भारताने हे ड्रोन हल्ले परतवून लावणारं तंत्रज्ञान आपण विकसित करायला हवं. तसंच जगामध्ये नेमकं काय चाललं आहे, कोणता देश कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, युद्धभूमीवर नेमकं काय सुरू आहे हा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि भविष्यातला धोका ओळखून त्या दृष्टीने तयारीही करायला हवी. आपल्यावर आपत्ती येईल तेव्हा बघू किंवा तहान लागल्यावर विहिर खोदू ही मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. अजरबैजान आणि अर्मेनिया या दोन राष्ट्रांमध्ये मध्यंतरी युद्ध झालं होतं. या युद्धात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. दोन्ही देशांच्या सैन्यांनी एकमेकांवर ड्रोन हल्ले केले. ही ताजी असणारी घटना आपण का बरं विसरतो? म्हणूनच येत्या काळात आपला बाह्यशत्रू तसंच अंतर्गत शत्रू कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर कधी आणि कशा पद्धतीने करेल याचा अभ्यास सातत्याने करावा लागणार आहे. याबाबतीत मागे राहून चालण्यासारखं नाही. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे एकीकडे चांगल्या गोष्टी घडत असल्या तरी वाईट गोष्टींसाठीही त्याचा वापर होतो ही बाब नाकारता येणार नाही.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर आपण बालाकोटवर हवाई हल्ले केले होते. त्याच पद्धतीने आता पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. असे हल्ले झाल्यानंतर एखादी समिती स्थापन करायची आणि मग या समितीमार्फत या सगळ्या कटाचा शोध घेण्यासारखे प्रकार आता करता येणार नाहीत. भारतीय हद्दीत आलेले ड्रोन फार लांबून आलेले नसतील. हे ड्रोन जिथून पाठवण्यात आले ते ठिकाण भारत-पाकिस्तान सीमारेषेपासून फार लांब नसेल. हे ड्रोन जिथून पाठवले जातात ती ठिकाणं उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. हे ड्रोन एखाद्या विमानतळावरून पाठवण्यात आले असतील तर त्या विमानतळावर हल्ला करायला हवा. भारत आपल्याला चोख धडा शिकवण्यास सक्षम आहे तसंच भारत आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे पाकिस्तानला कळणार नाही तोपर्यंत अशा हल्ल्यांचा धोका कायम राहणार आहे. आता भारताला ड्रोन टिपणारं तंत्रज्ञान विकसित करावं लागणार आहे. आपल्या शत्रूंपेक्षा तांत्रिक बाबतीत एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे. मध्यंतरी हमासने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलने ड्रोनचा वापर करून तो हल्ला हाणून पाडला. अवघ्या साडेचार मिनिटांमध्ये इस्रायलने हमासचा हल्ला परतवून लावला आणि त्यानंतर इस्रायलने हमासचं बरंच नुकसान केलं. त्यांचे भुयारी बंकर्स, इतर स्फोटकं नष्ट करण्यात आली. आपल्यालाही अशाच पद्धतीची कठोर कारवाई करण्याची गरज पडू शकते आणि अशी कारवाई करण्याची आपली तयारी असायला हवी. अशी तयारी असेल तरच आपलं राष्ट्र, आपली संपत्ती, आपली जनता, आपली मालमत्ता आणि आपली राष्ट्रीय सार्वभौमिकता सुरक्षित राहू शकते.