सरकारसोबतच्या चर्चेनंतर घोषणा
। शिर्डी / पुणतांबा । प्रतिनिधी ।
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा गावात सुरू असलेले शेतकरी आंदोलन पुढील तीन महिने स्थगित करत असल्याची घोषणा किसान क्रांतीकडून करण्यात आली आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेनंतर पुणतांबा गावात विशेष ग्रामसभा घेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. सरकारकडून 70 % मागण्या मान्य झाल्याचा दावा कोअर कमिटीच्या सदस्यांनी केला आहे.
शेतकर्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात शेतकर्यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला होता. 1 ते 5 जून दरम्यान पुणतांबा गावात धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्य सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घेत शेतकर्यांच्या शिष्टमंडळासोबत मुंबई येथे चर्चा केली. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पुणतांबा येथे सरपंच धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली.
2017 साली पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाची ठिणगी संपूर्ण राज्यात पसरली होती. त्यामुळे कधी नव्हे तो शेतकर्यांचा ऐतिहासिक संप घडून आला. आता पुन्हा शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा येथे किसान क्रांतीच्या वतीने पुणतांबा येथे शेतकर्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी संघटना आणि शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिला. राज्य सरकारने देखील या आंदोलनाची तातडीने दखल घेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकर्यांच्या मागण्या समजून घेतल्या.
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देखील पुणतांबा गावात येत आंदोलकांशी चर्चा करून मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठकीचे आमंत्रण दिले. त्यानुसार 7 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री, त्यांचे सचिव आणि आंदोलक शेतकर्यांचे शिष्टमंडळ अशी संयुक्त बैठक पार पडली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत राज्याशी संबंधित असणार्या मागण्यांवर बहुतांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कोअर कमिटीचे सदस्य शेतकरी नेते सरपंच धनंजय धनवटे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, सुहास वाहडणे यांनी दिली.