। आपटा । वार्ताहर ।
नेहमीच येतो पावसाळा नेहमीच येतो पूर आपटा गावाला अशी स्थिती या गावाची झाली असून,दरवर्षी पुरामध्ये शेतीबरोबरच मालमत्तेचेही नुकसान होत असल्याने पूरस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आपटा हे गाव मुंबई पुणे व मुंबई गोवा यांच्यामध्ये पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. दरवर्षी येथे सतत चार पाच तास मुसळधार पावसामुळे नदीला पूर येतो आणि नुकसानही होत राहते. यावर उपाय म्हणजे आपटा फाटा येथील नदीच्या काठावर असलेल्या रस्त्याची उंची वाढवणे, सखल भागात पूल उभा करणे, नदी काठी उंच कठडे बांधणे व रसायनी कडून जो रोड गावात येतो तेथे आपटा खिंडीतून सखल भाग उंची वाढवणे किंवा पूल बांधले गेले तर निश्चितच आपटावासियांची दरवर्षी येणार्या पुराच्या पाण्यातून सुटका होणे शक्य होईल.
याशिवाय गावातील बापूजी मंदिराच्या बाजूला नदीकडे जाणारा रस्ता जेथून नदीचे पाणी गावात घुसते व पूर येतो तेथे उंच बंधारा बांधला गेला पाहिजे. पाताळगंगा नदी ही खोल केली पाहिजे कारण सततच्या पूराने नदी गाळाने भरून उथळ झाली आहे.
यामुळेच आपटा गाव दरवर्षी पुराने वेढलेले असते.यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून,जर संबंधित लोकप्रतिनिधींनी याबाबत ठोस उपाययोजना टप्प्याटप्प्याने केल्या तर निश्चितच भविष्यात आपटेवासियांची पुरापासून सुटका होण्यास मदत होणार आहे.