। सुकेळी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या भंयकर खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेकदा तक्रारी करुनही दुरुस्ती होत नसल्यामुळे सोमवारी (दि.22) वाकण नाका येथे मनसेच्यावतीने बेधडक आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे सैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे महामार्गावर चक्काजाम झाला होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना करावा लागला.
या आंदोलनात मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देंवेंद्रजी गायकवाड, रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर, आंदोलनाचे प्रमुख तथा मनसे रोहा तालुका माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र तेलंगे, मनसेवि सेना जिल्हा अध्यक्ष प्रतिक रहाटे, रायगड जिल्हा संघटक प्रल्हाद पांरगे, तालुका महिला आघाडी प्रमुख दिपश्री घासे, तालुका सरचिटणीस साईनाथ धुळे, मनसे माथाडी सेना रोहा तालुका अध्यक्ष विनायक तेलंगे, गोरखनाथ पारंगे, नरेश भंडारी, मोरेश्वर तेलंगे, मनोज पारंगे, पंकज लवटे तसेच रोहा, नागोठणे विभागातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई -गोवा महामार्गाचे काम जवळजवळ 12 वर्षांपासून सुरू आहे. परंतु अद्यापही हे काम पुर्णत्वास झालेले दिसुन येत नाही. त्यातच पावसाळ्यापासून महामार्गाची अवस्था भयंकर झाली आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य तसेच चिखल, मोठ मोठे दगड रस्त्यावर पसरल्यामुळे याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
त्यातच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पाच्या सणासाठी अनेक कोकणवासीयांना याच खड्डयांमधुन प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर मनसेच्या वतीने वाकण नाका ते नागोठणे या दरम्यान बेधडकपणे आंदोलन केले.यावेळी मनसे रोहा तालुका माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र तेलंगे, तालुका महिला आघाडी प्रमुख दिपश्री घासे, तालुका सरचिटणीस साईनाथ धुळे, यांनी पळस्पे ते इंदापूर या दरम्यानच्या प्रकल्प संचालकांना निवेदन दिले होते.