सरपंच मनीष नांदगावकर यांच्या मागणीला यश
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील नांदगाव, मजगाव, अदाड, उसरोली, वेळास्ते आदी भागातील विद्यार्थी रोज सकाळी ज्ञानार्जनासाठी मुरुड शहराकडे येत असतात. आयटीआय अथवा जुनिअर कॉलेजसाठी रोज सकाळी मुले ही जात असतात. अलिबाग येथून सुटणार्या गाडीत एकच बस असल्याने या भागातील विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश मिळत नसे. कारण, गाडी फुल झाल्यावर या भागातील विद्यार्थ्यांचे खूप हाल होत असत.
सदरची परिस्थिती व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमधील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी मुरुड आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे यांची भेट घेऊन या भागातील विद्यार्थ्यंसाठी जादा बस सुरु करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. यावेळी आगारप्रमुख यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडून गाडी सुरु करण्याची परवानगी मिळताच तातडीने सुरु केल्याने असंख्य शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.