शिवशरण यादव
संयुक्त जनता दलाने भाजपची साथ सोडल्यानंतर बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाची सत्ता आली. बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाच्या अध्यक्षपदी लालूप्रसाद यादव यांची निवड झाली आहे. पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी आजारी असतानाही लालूप्रसाद यादव यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली असली तरी वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीमुळे हा पक्ष अडचणीत सापडला आहे.
बिहारमधला प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेला राष्ट्रीय जनता दल आपल्या वरिष्ठ नेत्यांमधल्या नाराजीमुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये कृषिमंत्री असलेल्या सुधाकरसिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते जगदानंद सिंह नाराज असल्याचं मानलं जात आहे. वादग्रस्त विधानामुळे सुधाकरसिंह यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांचे वडील जगदानंद सिंह हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष असून ज्या पद्धतीने मुलाला राजीनामा द्यावा लागला, त्यावरून ते नाराज आहेत. राष्ट्रीय जनता दलामधलं नाराजीनाट्य अशा वेळी पुढे आलं, जेव्हा लालूप्रसाद यादव उपचारासाठी सिंगापूरला रवाना झाले. न्यायालयाने त्यांना केवळ आठवडाभर देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली असली तरी सिंगापूरमधल्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्यास हा मुक्काम वाढू शकतो. याचाच अर्थ लालूंच्या अनुपस्थितीत पक्षावरचं संकट अधिक गडद होऊ शकतं. लालूप्रसाद यांची गेल्या महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याच वेळी पक्षातल्या गोंधळाला लगाम घालण्यासाठी, प्रकृती अस्वास्थ्य असतानाही गेल्या महिन्याच्या अखेरीस त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. असा अंदाज बांधला जात होता की, ते धाकटा मुलगा तेजस्वी यांच्याकडे औपचारिकपणे पक्षाची सूत्रं सोपवतील.मात्र तसं न घडल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत आणि प्रत्यक्षात पक्षप्रमुख म्हणून काम करत आहेत. लालूंचे निकटवर्तीय असलेले जगदानंद सिंह हे राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचा उच्चवर्णीय चेहरा आहेत. ते तेजस्वी यांना मुख्यमंत्री बनवण्याची जोरदार वकिली करत आहेत. तेजस्वी 2023 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री होतील, असं सांगून त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला नाराज केलं होतं. संयुक्त जनता दलाने ऑगस्टमध्ये तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री बनवून सरकार स्थापन केलं. संयुक्त जनता दलातून आलेली प्रतिक्रिया लक्षात घेऊन तेजस्वी यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं. गोंधळ शमवण्याचा प्रयत्न करताना त्यांनी आपल्याला घाई नाही आणि मुख्यमंत्रिपदाची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही, असं सांगितलं. त्यांनी लालूप्रसाद यांच्यामार्फत सिंग यांना आघाडी सरकारला धोका पोहोचेल अशी विधानं करू नयेत, अशी समज दिली. जगदानंद शांत झाले; पण त्यांचा मुलगा सुधाकर सिंह नितीशकुमार यांच्या विरोधात वक्तव्यं करत राहिला. सरकार भ्रष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं. या परिस्थितीत तेजस्वी यांना कोणतीही अडचण निर्माण करून सत्ता गमावायची नाही. त्यांनी पुन्हा लालूप्रसाद यांना सांगून जगदानंद यांच्यामार्फत मुलाला मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली. तेव्हापासून सिंह पिता-पुत्रांमध्ये अस्वस्थता वाटत आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेऊ शकतात. हा राष्ट्रीय जनता दलासाठी मोठा धक्का असेल.
तेजस्वी यांना कोणत्याही परिस्थितीत 2017 च्या घटनेची पुनरावृत्ती करायची नाही. उपमुख्यमंत्री म्हणून ही त्यांची दुसरी टर्म आहे. 2015 ते 2017 या कालावधीत ते वीस महिने या पदावर होते. त्यांची कार्यशैली आणि भ्रष्टाचारातल्या कथित सहभागामुळे नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडून भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे आता नितीशकुमार पुन्हा रागावणार नाहीत, याची काळजी तेजस्वी घेत आहेत. तथापि, सिंह पिता-पुत्र पक्षाला सतत अडचणीत आणत आहेत. यावेळी तेजस्वी यांनी जास्त संयम दाखवला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी संयुक्त विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याच्या नितीशकुमार यांच्या प्रयत्नात यश आल्यास नितीश त्यांच्याकडचं मुख्यमंत्रिपद तेजस्वी यांच्याकडे सोपवतील, अशी आशा राष्ट्रीय जनता दलाला आहे. तेजस्वी यांना अडचणीत आणण्यात सिंग पिता-पुत्र एकटेच जबाबदार नाहीत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दोन ऑक्टोबरपासून बिहारची साडेतीन हजार किलोमीटरची वॉकथॉन सुरू केली. ते देखील नियमितपणे तेजस्वी यांना लक्ष्य करतात. तेजस्वी यांची खिल्ली उडवत प्रशांत किशोर यांनी म्हटलं की नववी पास शिपाई होण्याचा विचारही करू शकत नाही; परंतु नववी पास असलेले तेजस्वी केवळ लालू यादव यांचा मुलगा असल्यामुळे उपमुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत. आघाडी सरकारच्या दुसर्या मंत्र्याने यापूर्वी राजीनामा दिला होता. कार्तिककुमार यांच्यानंतर राजीनामा देणारे सुधाकर सिंह हे राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडी सरकारमधले दुसरे मंत्री आहेत. तेजस्वी यांच्या संमतीने नितीशकुमार यांनी कायदामंत्रिपदावरून हकालपट्टी केल्यानंतर कार्तिककुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. तेजस्वी हे नितीशकुमार यांच्या सुरात सूर मिळवत आहेत. त्यांचा मूड चांगला ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाची भेट देतील, या अपेक्षेने तेजस्वी त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत आहेत, असा राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांचा समज बनला आहे. जगदानंद यांनी गेल्या आठवडाभरापासून पक्षापासून अंतर राखलं आहे. मुलगा सुधाकर सिंह यांना नितीश सरकारमधून काढून टाकल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि लालू कुटुंबाशी सर्व संबंध तोडले आहेत. ते फोनवरही बोलत नाहीत. जगदानंद यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयात येणं बंद केलं आहे. नितीशकुमार यांना केंद्रीय राजकारणात सक्रिय करून उत्तराधिकारी बनवण्याच्या तेजस्वी यादव यांच्या प्रयत्नांशी ते सहमत नसल्याचं बोललं जात आहे. बिहारबाहेर राष्ट्रीय जनता दलाचा पहिलाच मोठा कार्यक्रम दिल्लीत होत असताना बिहारचे प्रदेशाध्यक्ष असलेले जगदानंद शेवटच्या क्षणापर्यंत गैरहजर राहिल्याने प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. चार दशकांचं नातं तोडून लालूप्रसाद यांची साथ सोडण्याइतका राग जगदानंदांना आहे का, असा सवाल नेते-कार्यकर्ते करत आहेत.
समाजवादी युवा सभेचे उमेदवार म्हणून लालूप्रसाद 1973 मध्ये पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले, तेव्हा जगदानंद बनारस हिंदू विद्यापीठात राजकारण करत होते. 1985 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाल्यापासून त्यांना लालूप्रसाद यांचा पाठिंबा मिळाला. तेव्हापासून ते कधीही वेगळे झाले नाहीत. आता त्यांच्या पुढच्या वाटचालीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या तुलनेत महाआघाडीची ताकद जास्त असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं; परंतु महाआघाडीचे दोन मजबूत गट, राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलात एक रेषा आखली जात आहे. या दोन पक्षांमधलं नातं घट्ट करायचं की तोडायचं हे दोन्ही पक्षांमधल्या सामंजस्याच्या आधारेच ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाचा दोन्ही पक्षांतील अंतर वाढवण्याचा प्रयत्न आहे. भाजपचा हा हेतू साध्य होऊ नये यासाठीच आपण पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत नाही, हे नितीशकुमार सांगत आहेत.
नितीशकुमार आणि तेजस्वी यांच्यात सध्या कमालीचं सामंजस्य पहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याबाबत तेजस्वी यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला, पण राष्ट्रीय जनता दलातले मंत्री नितीश सरकारच्या कामगिरीवर वेळोवेळी प्रश्न उपस्थित करत आहेत. सुधाकर सिंह हे टीका करणारे पहिले मंत्री नाहीत. हे सरकार स्थापन झाल्यानंतर शिक्षणमंत्री झालेल्या चंद्रशेखर यांनी राज्याच्या शिक्षण मॉडेलपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते बदलण्याचं धाडस दाखवलं. सरकार नवीन असल्यामुळे संयुक्त जनता दलाने त्यावर काहीही भाष्य केलं नाही. सुधाकर सिंह हे व्यवस्थेवर इतके नाराज झाले की विभागीय बैठकीत स्वत:ला चोरांचा सरदार घोषित करून सर्वांनाच चोर म्हटलं. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितीशकुमार संतप्त झाले. अशी प्रकरणं एकापाठोपाठ एक समोर येत असल्याने सरकारच्या भवितव्याबद्दल शंका निर्माण होत असून भारतीय जनता पक्ष अंतर्विरोधावर आवाज उठवून आगीत इंधन भरत आहे.