| उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील पूर्व विभाग व मुंबई-गोवा-अलिबाग या महत्वाच्या मार्गांना जोडणार्या खोपटा येथील दोन्ही खाडी पुलावर खड्डे पडल्याने या खड्ड्यामुळे पुलावरून ये-जा करणार्या वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे पुलावरील खड्डे भरण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
तालुक्याच्या पूर्व व पश्चिम या दोन्ही भागांना जोडणारे दोन खोपटा खाडीपूल आहेत. यातील नवघर ते खोपटा दिशेच्या पुलावर खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे खोपटा ते नवघर या मार्गावरील पुलालाही खड्डे पडलेले आहेत. या पुलावरील डांबराचे थर उखडले आहेत. त्यामुळे ही खड्डे पडले आहेत. या पुलावरून दररोज शेकडो कंटेनर वाहने ये-जा करीत आहेत. या जड वाहनांमुळे खड्डयात वाढ होत आहे. त्याचप्रमाणे एस.टी. बसेस आणि नवीमुंबई महानगरपालिकेच्या एन.एम.एम.टी. बसेसही प्रवासी वाहतूक करीत आहेत. या खड्ड्याचा त्रास या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना ही सहन करावे लागत आहे. यातील एक पूल हा स्प्रिंगच्या सहाय्याने जोडले आहे. त्यामुळे खड्ड्यामुळे पुलावर बसणार्या धक्क्याचा परिणाम या स्प्रिंग वरही पडत आहे. त्यामुळे पुलावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. उरणच्या दोन विभागांना जोडणार्या या पुलावरील खड्डे भरण्याची मागणी केली जात आहे.