| मुंबई | वृत्तसंस्था |
गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईजवळ असलेल्या ठाण्यात शेजाऱ्यांनी एका 9 वर्षांच्या मुलांचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना घर बांधण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले. यानंतर मुलाच्या वडिलांकडून 23 लाख रुपयांची खंडणी मागितली. पण पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह घराच्या मागे लपवून ठेवला.
मुदासिर बुबेरे राहणार वांगणी यांचा याच परिसरात टेलरिंगचा छोटासा व्यवसाय आहे. त्यांचा 9 वर्षीय मुलगा इबाद हा रमजानचा महिना सुरु असल्याने नियमाप्रमाणे सायंकाळी नमाज अदा करण्यासाठी गेला होता. मात्र रात्रीचे 9 वाजून गेले तरी इबाद घरी आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी मोहल्यात शोधाशोध सुरु झाली. या दरम्यान इबादच्या पालकांना एक निनावी फोन येऊन 23 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. याबाबत मुद्दसीर यांनी पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत इबाद बेपत्ता झाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. पोलीस आणि परिसरातील लोक मिळून इबादचा शोध घेत होते.
त्यानंतर अपहरणकर्त्याने मोबाईलमध्ये दुसरे सिमकार्ड टाकून कॉल करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्याचे लोकेशन पोलिसांना समजले होते. पोलीस थेट त्यास गावातील फोन करणाऱ्या सलमान मौलवी यांच्या घरात दाखल झाले. पोलिसांनी शोधाशोध सुरु केली तर घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात गोणीत इबाद याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी सलमान, सफुयानसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस कुटुंबीयांकडे तपास करत आहेत.