धरमतहून जयगडकडे जात असल्याची माहिती
। रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात एक मालवाहू जहाज बंद पडले आहे. हे जहाज जेएसडब्ल्यू कंपनीचे असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. धरमतर बंदरातून 25 जुलै रोजी जयगडकडे ते रवाना झाले. मात्र, काही तांत्रिक कारणाने ते भर समुद्रात बंद पडले. कंपनी अन्य जहाज पाठवून त्यातील तांत्रिक बिघाड दुर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मरीन ट्रॅफिक सिस्टमध्ये या जहाजे लोकेशन हे कुलाबा परिसरात असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे समुद्राला देखील चांगलेच उधाण आले आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असते, मात्र मोठाल्या मालवाहू जहाजांचा प्रवास सुरु असतो. कुलाबा किल्ला परिसरात एक भले मोठे जहाज थांबल्याचे दिसत आहे. हे जहाज जेएसडब्ल्यूचे असून ते धरमत बंदरातून 25 जुलै रोजी जयगड बंदराकडे कच्चा माल घेऊन (कोळसा) निघाले होते. मात्र, खराब हवामान अथवा काही तांत्रिक कारणाने ते जहाज भरसमुद्रात थांबले असावे, असे सूत्रांनी सांगितले. यासंबंधी जिल्हा प्रशासन माहिती घेत आहे. त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार हे जहाज जेएसडब्ल्यूचे असल्याचे सांगितले.







