। रसायनी । वार्ताहर ।
तळवली येथील शालेय व्यवस्थापन कमिटी शिक्षणप्रेमी अतुल दत्तात्रेय मालकर यांनी दांडवाडी ते तळवली हा पायमार्ग पूर्वीपासून वापरात होता. परंतु, एका कंपनीने रस्त्याच्या जागेवर संरक्षण भिंत बांधल्याने ही पायवाट बंद झाली आहे. यामुळे येथील आदीवसी विद्यार्थ्यांना दांडवाडी डोंगरावरून तळवली असा रोजचा दिड किलोमीटरचा धोकादायक पायी प्रवास करावा लागत आहे. याबाबत शासनाकडे तक्रार अर्ज करण्यात आला होता. त्याअनुषंगाने वासांबे मंडळ अधिकारी यांनी पंचासमक्ष पाहणी केली असता जागेवरती येण्या-जाण्याकरीता असणारी पायवाट अडवून संरक्षण भिंत बांधल्याने पायवाट बंद झाल्याचे दिसून आले. शिवाय नकाशावरही पुर्वापार पायवाट असल्याचे निष्पन्न झाले.
तळवली जिल्हापरिषद शाळेत दांड आदीवासी वाडीतील पहिली ते चौथीत शिकणारे 25 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना दांडवाडी डोंगरावरून तळवली असा रोजचा दिड किलोमीटरचा धोकादायक पायी प्रवास करावा लागत आहे. डोंगरावरून येणारे पाण्याचे ओढे ओलांडून शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन या चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओढा ओलांडावा लागत आहे. यावेळी काही अनर्थ झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे. तसेच, दांडवाडी डोंगरावरुन खाली उतरण्याची ही पुर्वापार पायवाट अडविणार्यांवर कारवाई करण्याची मागणी आदीवासी बांधवांनी केली आहे.