पत्नीसोबत चारित्र्याच्या संशयावरून, मित्रानेच केली मित्राची हत्या

| उरण | वार्ताहर |

उरणमधील जासई गावात दि.बा. पाटील सभागृहाशेजारी असलेल्या झाडाझूडपात गोणीत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत तात्काळ तपासाला सुरुवात केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून धक्कादायक पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. दत्तात्रय घुटुकडे, असे मृताचे नाव असून त्याचा मित्र आरोपी बालगंधर्व गोरड याने त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. बालगंधर्व आणि दत्तात्रय एकाच ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होते. बालगंधर्व याला दत्तात्रयचे आपल्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून त्याने दत्तात्रयला आपल्या घरी दारू पिण्यास बोलावले होते. दारूची नशा चढल्यावर बालगंधर्वने दत्तात्रयच्या डोक्यात दगड टाकून हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आपली पत्नी वैशालीला मदत करण्यास भाग पाडले होते. उरण पोलीसांनी गुन्हा दाखल करत बालगंधर्व गोरड आणि वैशाली गोरड या दोघांना अटक केली आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे. मृतदेह गोणीत आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. गोणीत गुंडाळून आरोपींनी मृतदेह झुडपात फेकून दिला होता. पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.

Exit mobile version