तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड

नेरळकरांकडून सुशोभिकरांचा दर्जा पाहून संताप व्यक्त

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये अमृत सरोवर अभियानांतर्गत सरोवर सुशोभिकरणाचे काम केले जात आहे. राजमाता जिजामाता तलावामध्ये या अभियानांतर्गत बांधकाम सुरू आहे. मात्र, मागील महिन्याभरात बांधकाम करण्यात आलेल्या तलावाची भिंत पहिल्याच पावसात कोसळली आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर तब्बल दोन कोटी खर्चून बनवण्यात येत असलेल्या तलाव सुशोभिकरण कामाचा दर्जा पाहून नेरळकर संतप्त झाले आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अमृत सरोवर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामधून नेरळ ग्रामपंचायतीमधील राजमाता जिजामाता तलाव येथे अमृत सरोवर सुशोभिकरण करण्याचे काम केले जात आहे. तब्बल दोन कोटी रुपयांच्या खर्चातून राजमाता जिजामाता तलाव येथे संरक्षण भिंत, तलाव खोलीकरण आदी कामे मंजूर होती. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने नोव्हेंबर 2021 मध्ये कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर त्या कामाची मुदत वर्षभराची होती आणि नेरळ येथे ग्रामपंचायतचे तलावात लावलेल्या फलकावर निर्देशित केले आहे. मात्र, आज 2024 सुरू असून, त्याप्रमाणे अमृत सरोवर अभियानामधून सुरू असलेले काम हे दोन वर्षांपूर्वीचे मंजूर काम आहे.मग ते बांधकाम तब्बल दोन वर्षे नंतर का सुरू होत आहे आणि त्यासाठी जिल्हा जल संधारणा विभागाने कशी मंजुरी दिली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

मात्र नेरळ ग्रामपंचायत मध्ये तब्बल दोन कोटींचा खर्च करून बांधण्यात येत असलेल्या राजमाता जिजामाता तलावात उभारण्यात आलेली भिंत पहिल्याच पावसात कोसळली आहे. त्यामुळे दोन वर्षे उशिरा बांधकाम केले जात असताना मागील दीड महिन्यात करण्यात आलेले बांधकाम पाहिल्यावर निकृष्ट कामाचा नमुना या ठिकाणी दिसून येत आहे, असा आरोप नेरळकर करीत आहेत. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात बांधकामाच्या दर्जाची चर्चा सुरू असून, चौकशी करण्याची मागणी होत आहे.

काल आम्ही कर्जतमध्ये नव्हतो आणि त्यामुळे पावसाचा अंदाज आला नाही. मात्र, नेरळ येथे अमृत सरोवरमधून सुरू असलेल्या तलावातील बांधकाम कोसळले असल्याची माहिती ठेकेदाराने दिली नाही. मात्र, आम्हाला माहिती मिळाली असून, आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहोत.

निलेश खिल्लारे,
उपअभियंता, राजिप
Exit mobile version