| भिवंडी | वृत्तसंस्था |
शहरातील कल्याण रोडजवळ सुभाषनगर येथील मुरलीधर कंपाऊंडमधील यंत्रमाग कारखाना आगीत भस्मसात झाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कच्च्या कपड्याचे ताके जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. कल्याण रोडजवळील सुभाष नगरच्या मुरलीधर कंपाऊंडमध्ये कच्चा कापड विणण्याचा यंत्रमाग कारखाना सुरू होता. सोमवारी (दि. 8) दुपारचा एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे कारखान्यातील कापडाला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे कामगारांनी प्रसंगावधान राखत कारखान्यातून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्याfत आले; परंतु शहरातील वाहतूक कोंडीमुळे पोहचण्यास उशीर झाल्याने कारखान्यातील कापडाचे ताके जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून या कारखान्यातील यंत्रसामग्रीसह सुमारे 150 ते 200 कपड्याचे ताके जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.