| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
खारेपाट परिसरात असलेल्या असंख्य तलावांवर आणि तळ्यांमुळे हजारो कुटुंबांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. याशिवाय याच तलावांवर रोजगारही अवलंबून आहे. या तलावांतील पाणी इतके शुद्ध आहे की, या तलावांमध्ये कधीही कमळ फुलले नाही आणि भविष्यातही फुलणार नाही, असा सूचक टोला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी नाव न घेता लगावला.

खारेपाटात आजवर अनेक संघर्ष झाले असून, ही केवळ निवडणूक नसून, अस्तित्वाची लढाई आहे. खारेपाटातील जनता कधीही कमळ फुलू देणार नाही. येथील पाणी आणि माती दोन्हीही जनतेच्या विरोधात काम करणाऱ्यांना साथ देणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत जयंत पाटील यांनी या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघातून शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवार पूजा अजित भगत, आंबेपूर पंचायत समिती मतदार संघातून शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चंद्रकांत म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.4) सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, साधना पाटील, शैला पाटील, प्रकाश जैन, करण शेठ, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, काँग्रेसचे नेते ॲड. उमेश ठाकूर, सूनील पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील छाया पिंगळे, विलास म्हात्रे, आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार पूजा अजित भगत, आंबेपूर पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार धनंजय चंद्रकांत म्हात्रे आदींसह शेकाप, काँग्र्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील दहा दिवसांत रायगड जिल्हा आणि अलिबाग तालुक्यात व्यापक जनसंपर्क साधल्याचे सांगत जयंत पाटील म्हणाले की, सांबरी टोकापासून ते नवगावच्या टोकापर्यंत फिरून मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. खारेपाटाने स्वातंत्र्यपूर्व काळात उभारलेला लढा आणि स्व. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी झालेल्या कूळ कायद्याच्या चळवळीचा त्यांनी विशेष उल्लेख केला. कसेल त्याची जमीन हा कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारला भाग पाडणाऱ्या लढ्यात खारेपाटातील अनेक घराण्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

अलिबाग तालुक्यात शेकाप महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार उच्चशिक्षित आणि पक्षनिष्ठ असून ते गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, काही जवळचे सोडून गेले, पण इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. खारेपाटाच्या मातीशी असलेले नाते आणि कार्यकर्त्यांची निष्ठा शेकापच्या ताकदीचे मूळ असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सध्या टक्केवारीचे राजकारण सुरु आहे. खोटी बिले काढून लुट केली जात आहे. हिंदूत्वाच्या नावाखाली मते मिळवितात. मात्र याच भाजपकडून महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला काळीमा फासण्याचे काम केले जात आहे. या खारेपाटामुळे विधीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. मात्र कधीही खारेपाटाला विसरलो नाही. खारेपाटा हा प्रेरणा देणारा आहे. आजच्या सभेच्या निमित्ताने खारेपाटातील जनतेने जल्लोषात स्वागत केल्याचा आनंद आहे. हीच खरी पोच पावती आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

खारेपाटातून स्फूर्ती मिळते
पोयनाडमध्ये अनेक वर्षांनंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीत झालेल्या भव्य सभेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी खारेपाटाशी असलेले आपले भावनिक नाते अधोरेखित करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. माझा खारेपाट मला स्फूर्ती देतो; इथूनच महाराष्ट्रभर काम करण्याची उर्जा मिळाली, असे सांगत त्यांनी खारेपाटाच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून दिली.

लाल बावटा अभिमानाचा
ज्या खारेपाटाच्या जीवावर जिल्ह्यावर राज्य केलं, विधीमंडळात प्रभावी आमदार पाठवले, आज त्या खारेपाटात पुन्हा एकदा शेकापचा लाल बावटा फडकवायचा आहे. अलिबागच्या भूमीने शेकापचे असो वा दुसऱ्या पक्षाचे आजपर्यंत निष्ठावंत, भ्रष्टाचारात न अडकलेले आमदार निवडून दिले आहेत. मात्र आता टक्केवारीचे राजकारण सुरु आहे. कोणीही कितीही पक्ष बदलले तरी तुम्ही पाठीशी ठामपणे उभे आहात म्हणून कसलीही भिती नाही. जनतेमध्ये चीड, द्वेष आहे, त्यामुळे बदला घ्यायचा आहे. पक्ष बदलून काही लोक गेले, मात्र आजही खारेपाटातील निष्ठावंत जनता लालबावट्यासोबत आहे. आणि म्हणूनच शेकापचा लालबावटा अभिमानाने फडकत आहे.
गरीबाला विसरु नका
जोपर्यंत शेकाप व जयंत पाटील जीवंत आहे, तोपर्यंत खारेपाटासह स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही. आपला खारेपाट आगरी कोळीसह अनेक समाजांचा आहे. या भागात तिसरी मुंबई येत आहे. या मुंबईत आपला स्थानिक टिकला पाहिजे. यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. तिसऱ्या मुंबईचा उपयोग खारेपाटाच्या उन्नतीसाठी करायचा आहे. निवडून आल्यावर गरीबांना विसरु नका, तुम्हाला कधीच कमी पडणार नाही, असा मोलाचा सल्ला जयंत पाटील यांनी उमेदवारांना दिला.







