अधिकारी, कर्मचार्यांना प्रशिक्षण
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2022-23 अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना क्षमता बांधणी व प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी ठिकठिकाणी 30 सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील विकासकामाचे नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण यासाठी पंचायत राज संस्थांना निधी, कार्य व कार्यबलाचे व्यवस्थापकीय जबाबदारीचे सक्षमीकरण आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज योजना राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रशिक्षण व क्षमताबांधणीचा प्रमुख कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रम सुरळीतपणे आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी राज्यस्तरावरील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या उपक्रमांतर्गत विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका यांना क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसेच सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम संसाधन गट, ग्रामसंघ, सीआरपी, अंगणवाडी सेविका, हीसीपीसी, फॅसिलीटर यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत ठिकठिकाणी शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.