तीन आरोपींना अटक
। ठाणे । वृत्तसंस्था ।
ठाणे जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण तालुक्यातील शिळगावात राहणारी 30 वर्षीय महिला घरातील वादामुळे मानसिक तणावाखाली 6 जुलै रोजी सकाळी 10 च्या सुमारास घरातून बाहेर पडून घोळ गणपती परिसरात आली होती. पूर्ण रात्र ती या परिसरात एकटी असल्याचे पाहून तिघांनी तिचा फायदा घेत तिला चहामधून भांगेच्या गोळ्या दिल्या. भांगेची नशा चढल्यानंतर तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिघांनी तिच्यावर जबरदस्ती केली. काही वेळाने शुद्धीत आल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला आणि तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या तीन आरोपींनी तिला मारहाण केली व तिचे डोके जमिनीवर आपटून, गळा दाबून तिची हत्या केली.
त्यानंतर, मंगळवारी घोळ गणपती मंदिराजवळ एका महिलेचा मृतदेह दिसल्याची माहिती एका व्यक्तीने शिळ डायघर पोलीस ठाण्यात दिली. या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना शरिरावर जखमा असलेला तसेच अर्धनग्न अवस्थेत असलेला महिलेचा मृतदेह आढळला. याबाबत शोध घेत असता नवी मुंबई येथील एन.आर.आय पोलीस ठाण्यात या महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आल्याचे समजले. तसेच, प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपासानंतर पोलिसांनी आरोपी श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (62), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (45) आणि राजकुमार रामफेर पांडे (54) या तिघांना अटक केली आहे.