| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाणे क्षेत्रात जुन्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.6) रात्री घडली. यात दहा ते बारा जणांनी मिळून एकाला घेरले. सर्वांनी त्याला बेदम चोप देत शस्त्रांचे सपासप वार केले. ती व्यक्ती निपचित पडल्यावर सर्वांनी पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी रातोरात काही जणांना ताब्यात घेतले.
लकी शेख, अरहम पटेल, प्रकाश सिंग उर्फ चपटी, अजय निर्मल, वसीम राईं, सोहेम शेख, साहिल उर्फ प्रायवेट, सुफियान खान उर्फ बंबय्या, अपसर पटेल, अमीन खान उर्फ कालिया, मोहम्मद शेख आणि अन्य असे यातील संशयित आरोपींची नावे आहेत. तर अमित यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मयत यादव आणि संशयित आरोपी हे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून गेल्या काही वर्षांपासून खैरणे गाव भागात असणाऱ्या कोपरी गाव परिसरातील राहण्यास आहेत. मयत यादव आणि संशयित आरोपी यांच्यात काही जुने किरकोळ वाद होते. हे वाद मिटवण्यात आले होते. मात्र तरीही संशयित आरोपींचे समाधान झाले नव्हते. त्यात यादव हा गेले काही दिवस परिसरात दिसत नव्हता. मात्र, मंगळवारी तो कोपरी गाव परिसरात असल्याची माहिती संशयित आरोपींना मिळाली. त्याचा शोध परिसरात घेत असताना यादव हा कोपरी गावातील साईबाबा मंदिर परिसरात आढळून येताच सर्व आरोपी रात्री साडे अकराच्या सुमारास दुचाकीवर आले आणि चित्रपटातील दृष्याप्रमाणे सर्वांनी त्याला घेरले.
सर्वांनी त्याला बेदम चोप दिल्यावर त्यातील वसीम, अजय, दिनेश, सोहेल यांनी त्यांच्या हातातील धारधार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले. तो मयत झाला सर्वांनी पळ काढाला. ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे सह पथकाने घटनास्थळी भेट दिली. दरम्यान जखमी यादव याला वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.







