भारत सरकारच्या प्रयत्नांना यश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु, ही शिक्षा आता रद्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस ॲण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते. रॉयल ओमान एअर फोर्समधून निवृत्त झालेले वैमानिक व ओमानी नागरिक खमिस अल अजमी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या आठ भारतीयांसह त्यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर 2022 रोजी त्यांची सुटका करण्यात आली. कतारमधील यंत्रणेने माजी आठ अधिकाऱ्यांना 30 ऑगस्ट 2022 रोजी अटक केली होती. त्यानंतर कतारच्या न्यायालयाने 26 ऑक्टोबरला हेरगिरीच्या आरोपावरून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.