मागीलवर्षी पेक्षा भाव कमी, आदिवासींचा हक्काचा रोजगार
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागडसह जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आता जंगल, व रानावनात डोंगराळ भागात उपलब्द होणारी कंदमुळं जगण्याचा आधार बनतायेत. जंगल व डोंगर रांगांनी वेढलेल्या जिल्ह्यात सध्या आरोग्यदायी विविध कंदमुळांचे भरघोस उत्पादन मिळत आहे. सध्या सर्वच बाजारपेठेत कणक, करंदे, चाई, आळू, वरा, लोंढी व रताळी आदी कंदमुळांची विक्री आदिवासी बांधव करत आहेत. शिवाय मागील वर्षी पेक्षा भाव कमी आहेत. आदिवासींना यातून रोजगार देखील मिळत आहे. यंदा सुधागडसह जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांवर त्यामध्ये बहुतांश ठाकूरवाड्यांवर घराशेजारील परसबागेत, माळरानावर व डोंगरावर कंदमुळांचे मोठ्या प्रमाणत उत्पादन घेतले गेले आहे. परिणामी भरघोस उत्पादन आले आहे. त्यामुळे मागील वर्षी 60 ते 70 रुपये किलोने मिळणारे कणक, करंदे, चाई, वारा, आळू, लोंढी, रताळी आदी कंदमुळे यंदा अवघे 40 ते 50 रुपये किलोने मिळत आहेत. शिवाय मागील वर्षी कोरोनामुळे उत्पादन घेता आले नाही. तसेच बाजार देखील बंद होते. त्यामुळे मागील वर्षी किंमत अधिक होती असे करंजघर येथील कंदमुळे उत्पादक व विक्रेती लक्ष्मी लेंडी यांनी सांगितले. तर नागोठणे येथील दिलीप सोनावणे म्हणाले की या हंगामात मिळणारे हे विविध आरोग्यवर्धक कंदमुळे आवर्जून खातो. शिवाय मुंबई-पुणे आदी शहरात राहणार्या नातेवाईकांना भेट म्हणून देखील अनेकजण देतात. शहरात ही कंदमुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने महाग मिळतात.
- कंदमुळे विक्रीतून आदिवासींना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. मात्र आदिवासींनी उत्पादित केलेली कंदमुळे तसेच वरी, नाचणी ही पिके व गावठी भाज्यांच्या विक्रीसाठी शासनाने हक्काची बाजारपेठ दिली पाहिजे. त्याबरोबरच या सर्व मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे. वाहतुकीची स्वस्त व्यवस्था केली पाहिजे. यातून आदिवासींचे जीवनमान अधिक चांगले उंचावू शकेल.- रमेश पवार, सुधागड, कोकण संघटक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद