| पाताळगंगा | प्रतिनिधाी |
येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाला सुरूवात होणार असून त्यासाठी पावसाळी हंगामातील पिकांच्या तयारीसाठी खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. नांगरणी, कोळपणीसह अन्य कामांची शेतकऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला होता. त्यामुळे यंदा काय होणार याची सर्वांना आस लागली आहे. काही दिवसातच या पावसास सुरूवात होणार असून या हंगामाच्या पिकाच्या तयारीसाठी शेतांची नांगरणी खुरपणी, बांधावरील गवत पेटवणे, शेणखत शेतात पसरवणे, जमिन भुसभुशीत करणे अशी विविध कामे सुरू आहेत. तर पावसाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या शेतीची मशागत करण्यामध्ये वेग वाढला आहे. गेल्या हंगामात पावसाने काही ठिकाणी मोठी हजेरी लावली होती. यंदा येणाऱ्या पाऊसाचे रुप कसे असणार, याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.